MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री पदाचा पेच सुटला , आता आमदारांची मंत्रीपद मिळविण्यासाठी जोरदार रस्सीखेच !!
मुंबई : मुख्यमंत्रिपादाचा पेच सुटल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आपली वादरनी लागावी म्हणून आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच आणि लॉबिंग सुरु झाली आहे. उद्या तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या पार पडणार असल्याचे सांगितलेले जात आहे. पण त्यांच्यासोबत आणखी काही मंत्र्यांचा शपथविधी होईल का याबाबत अजून काहीही समोर आलेले नाही. असे असले तरी महायुतीमध्ये कोणात्या पक्षाला कोणती खाते मिळणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं असताना कोणत्या नेत्यांना कोणते मंत्रिपद मिळणार याबाबत ही उत्सुकता लागली आहे.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गेल्या २ दिवसांपासून आपल्या आपल्या नेत्यांची भेट घेत होते. महायुतीच्या या मंत्रिमंडळात काही जुन्या आणि काही नव्या आमदारांनी मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, नितेश राणे, गणेश नाईक, राहुल नार्वेकर, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ या नावांची चर्चा आहे.
राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेकडून दीपक केसरकर, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मंत्रीपदासाठी काही अटी ठेवल्या आहेत. या अटी पूर्ण करणाऱ्या आमदारांनाच मंत्रीपद दिले जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले होते. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, पक्षाचे प्रामाणिकपणे केलेले काम यावरुन आमदारांना मंत्रीपद दिले जाणार आहे. याशिवाय मंत्रालयात कामगिरी कशी होती, मंत्रायलयात किती वेळ उपस्थित होते, आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती, निधीचे वाटप कसे केले असे वेगवेगळे निकष ठेवण्यात आले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या नेत्यांच्या कामाचा देखील आढावा घेतला जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये त्यांचा सहभाग कसा होता. ते कोणत्या वादात अडकले होते का याबाबत आढावा घेतला जाणार आहे. सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळेल. यावेळी तरुण आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे आधी मंत्री असलेल्यांची धाकधूक वाढली आहे.
महायुतीचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेला 10 ते 12, राष्ट्रवादीला 8 ते 9 आणि भाजपला 20 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिपदासाठी माझा विचार नक्की केला जाईल- संजय शिरसाट
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीस विराजमान होणार हे निश्चित झाल्या नंतर शिवसेना नेत्यांकडून देखील आता त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे, आमची इच्छा होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे मात्र भाजप वरिष्ठांनी दिलेला निर्णय देखील आम्हाला मान्य असल्याचे संजय शिरसाट म्हणाले आहेत, आज दुपारी सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर मंत्री पदाचा निर्णय तीनही नेते एकत्र बसून घेतील असे ते म्हणाले, तसेच यावेळी माझा विचार नक्की केला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.