महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण ? शरद पवार यांनी जाहीर केले सूत्र ……

मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. आम्ही महाविकास आघाडीतील नेतेमंडळी बसून यावर चर्चा करू. जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल त्यांचा नेता मुख्यमंत्री होईल.
पवार पुढे म्हणलेले की , ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा येतील, आम्ही त्यांना विनंती करू की तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडा, आमचा त्याला संपूर्ण पाठिंबा असेल. याचाच अर्थ ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होईल. माझ्या पक्षाचे हेच धोरण आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आणि महाविकास आघाडीची सत्ता आल्यास कोणाचा मुख्यमंत्री होणार, या चर्चांना एक प्रकारे स्पष्ट उत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, आम्हाला राज्यात स्पष्ट चित्र दिसत आहे की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल. सध्या राज्यात मविआला अनुकूल वातावरण आहे. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. त्यावेळी जनतेने त्यांच्या मनात काय आहे ते स्पष्ट सांगितले. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली होती, तेव्हा काँग्रेसला केवळ एक जागा जिंकता आली होती, तर आम्ही चार जागा जिंकल्या होत्या. आता झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने तब्बल ३१ जागा जिंकल्या. यावरून लोकांचा कल काय आहे ते स्पष्ट झाले, असे शरद पवार यांनी नमूद केले.