जरांगे यांचं ठरलं !! रविवारी उमेदवार जाहीर करणार , मराठा , बौद्ध , मुस्लिमांची ताकद दाखवणार….

जालना : आम्ही उमेदवारीवर भांडणार नाही. आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार आहोत. पण आम्हाला त्रास देणाऱ्यांना मात्र सोडणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. येत्या 3 तारखेला भूमिका जाहीर करणार आहे. 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यातील एकच राहील, बाकीच्यांनी फॉर्म काढायचे आहेत असेही जरांगे पाटील म्हणाले. आज मनोज जरांगे पाटील यांनी सज्जाद नोमांनी, आनंदराज आंबेडकर यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
मराठ्यांनी इथून पुढे आझाद म्हणून जगाव असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मायक्रो ओबीसींना , शेतकऱ्यांना तुम्ही काय दिलं? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला. आता परिवर्तन होणार आहे. आम्हाला देवेंद्र त्यात्यांनी लै शिकवलं असे म्हणत जरांगे पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. आम्ही लोकशाही मार्गाने चाललोय. कधी जात म्हणून मी बघणार नाही असेही ते म्हणाले. सध्या शेती मालाला दर नाही, दुधाला दर नाही असेही जरांगे म्हणाले.
मी अर्ज मागे घेण्यास सांगितले की सूचनेनुसार संबंधित लोकांनी अर्ज मागे घ्यावेत, असे जरांगे यांनी आधीच सांगितले होते. त्यानुसार ३ तारखेला किती जागा लढायच्या, कोणत्या जागा लढायच्या आणि उमेदवार कोण असणार? याची घोषणा जरांगे करणार आहेत. दोन नोव्हेंबरलाच मनोज जरांगे उमेदवारांची घोषणा करणार होते. परंतु ओबीसी, बंजारा आणि लिंगायत धर्मगुरू भेटीला येणार असल्याने त्यांचाही समावेश परिवर्तनाच्या लढ्यात करण्याचा मानस जरांगे यांनी बोलून दाखवला. त्याचमुळे जरांगे यांनी २४ तास वाढवून मागत असल्याचे सांगितले.
मराठा आरक्षण मिळवून देण्याच्या सामाजिक लढ्याने आता राजकीय रूप धारण केले असून निवडणुकीच्या रिंगणात उतरून सत्ताधाऱ्यांना धडा शिकविण्याचा निर्धार आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आपल्यावरील अन्यायाचं संकट परतावून लावायचं आहे. त्यामुळे मराठा दलित आणि मुस्लिम असे सगळे घटक एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, असे सांगत येत्या ३ तारखेला किती जागा लढायच्या, कोणत्या जागा लढायच्या आणि उमेदवार कोण असणार? याची घोषणा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा, मुस्लिम आणि बौद्ध एकत्र आले…
आम्ही धोक्यात आहोत तर मग हे हिंदू का म्हणत नाहीत की गरीब मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. एकमेकांच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही. मी कट्टर हिंदू आहे. आम्ही सत्ता परिवर्तन करणार आहोत असेही जरांगे पाटील म्हणाले. मराठा, मुस्लिम आणि बौद्ध एकत्र आले असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आमची सहनशक्ती संपली
आम्ही लोकशाही मार्गाने पुढे जात आहोत. कोणीही दादागिरी करणार नाही असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. जे नाव सांगेल त्यांनीच उमेदवारी ठेवायची, बाकीच्यांनी अर्ज काढून घ्यायचे असेही मनोज जरांगे म्हणाले. लोकशाही मार्गाने लढा, आपल्या जागा सगळ्या ठिकाणी निवडून येतील असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आपला समाज राजकीय लोकांच्या गुंडगिरीतून बाहेर काढला असल्याचे जरांगे म्हणाले. तुम्ही मराठ्यांना, धनगरांना, मुस्लिमांना, दलितांना , बौद्धांना काय दिलं आहे असा सवालही मनोज जरांगे यांनी केला. गेल्या 75 वर्षीत वीज पाणी यावरच बोलत आहेत असे जरांगे म्हणाले. अन्याय होऊ न देण्यासाठी ही लढाई आहे. आमची सहनशक्ती संपली आहे. तुमचा सुपडा साफ करणार म्हणजे करणार असे जरांगे म्हणाले.
चार तारखेला मी सांगितल्यानंतर संबंधितांनी लगोलग अर्ज मागे घ्यावेत. मी सांगितलेला अर्जच फक्त राहिल, बाकीचे अर्ज लगोलग मागे घ्यायचे. बाकीच्या लोकांनी स्टार प्रचारक म्हणून मी सांगितलेल्या उमेदवाराचे काम करायचे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.