महाविकास आघाडीत चाललंय काय ? काही जागांवरून टोकाचे मतभेद , राऊत पटोले यांच्यात वाकयुद्ध ….

मुंबई : नुकतीच विधानसभा निवडणूक झालेली असताना आणि जागा वाटपाची प्रतीक्षा केली जात असतानाच काही जागांवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाकयुद्ध रंगल्याचे दिसत आहे. कारण, राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे जागावाटपाच्या चर्चेसाठी सक्षम नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते . त्यावर, नाना पटोले यांनीही थेट पत्रकार परिषदेतूनच राऊत यांच्यावर पलटवार करताना मला राऊत यांना नक्की काय म्हणायचे आहे ते कळले नसल्याचे म्हटले आहे.
या दोन्ही नेत्यांमधील वादावर आता वरिष्ठांच्याही प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच ह्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. तर, दुसरीकडे शरद पवारांनीही दिल्लीतील नेत्यांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती आहे.
दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज राज्य निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांची भेट घेतली. त्यानंतर, शिवसेनेच्या शिवालय जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, मविआ नेत्यांची ही पत्रकार परिषद चर्चेत राहिली ती, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या विसंवादामुळे. संजय राऊत हे त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं म्हणजेच उद्धव ठाकरेंचे ऐकत नसतील तर हा त्यांचा प्रश्न आहे, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय राऊतांबद्दलची नाराजी उघड केली. आम्हाला आमचे नेते पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना रिपोर्टींग करावे लागते. जयंत पाटील यांना शरद पवार यांना सांगावे लागते पण राऊत यांना ठाकरेंना सांगावे लागते कि नाही , मला काही माहित नाही असे पटोले यांनी म्हटले आहे.
मी याबाबत माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन…
या वादावर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी याबाबत माहिती घेईन आणि तुमच्याशी बोलेन, असे एका वाक्यात उत्तर दिले. तसेच, जागावाटपावेळी खेचाखेची होत असते, पण ती तुटेपर्यंत ताणायचे नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जास्त पक्ष असल्यावर ओढाताण होत असते प्रत्येक पक्षाला जागा हवी असते. मात्र, ओढाताण होत असताना ती ओढाताण एवढी होऊ नये की ती तुटेल याचे भान सर्व नेत्यांना असायला हवे ,असेही ठाकरेंनी म्हटले आहे . दुसरीकडे शरद पवार यांनीही मध्यस्थीसाठी दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करुन चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान, उद्या तर उद्या किंवा दोन ते तीन दिवसांत महाविकास आघाडीतील जागावाटप होईल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील जागा वाटपावरुन काँग्रेस व शिवसेनेत सुरू असलेल्या वादावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी थेट काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा केल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत वाद विकोपाला जात असताना आता शरद पवारांनी मध्यस्थी केल्याचे समजते. शरद पवारांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला आणि के सी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्याअनुषंगाने जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच आता महाविकास आघाडीत जागावाटपावरुन खडाजंगी होत असल्याचं स्पष्ट होत आहे. कारण, नाना पटोले यापुढे जागावाटपाच्या बैठकीत असल्यास शिवसेना ठाकरे गटाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी भूमिका शिवसेना ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप हे नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे आडत असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे याबाबत दिल्लीतील काँग्रेसकडे नाना पटोले यांची तक्रारही करण्यात येणार आहे. जागावाटपाची चर्चा ठाकरेंचे नेते हे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींशी करत आहेत, तिढा असलेल्या जागा लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जावे, अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेची आहे.
शेकापचाही बंडखोरीचा इशारा
महाविकास आघाडीमध्येही जागावाटपावरुन राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे. समाजवादी पक्षाच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेनंतर आता आणखी एक घटक पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीत सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली. महाविकास आघाडीत सांगोला विधानसभेची जागा शेकापच्या वाट्याला असताना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांना पक्षात घेतल्याने शेकापची नाराजी आहे. जर महाविकास आघाडीत वेगळा निर्णय घेतला जात असेल तर शेकाप आपला उमेदवार देणार असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी म्हटले आहे.