निमित्त उद्घाटनाचे काँग्रेसवर तुटून पडले पंतप्रधान नरेंद्र मोदी , हरयाणा तर भाजपा जिंकली, आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे….

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालये आणि इतर कामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसचा प्रत्येक कट उधळून लावण्याचे आवाहन केले.तसे नरेंद्र मोदी काँग्रेसबाबत नेहमीच आक्रमक असतात परंतु काल हरयाणाचे निकाल लागल्यानंतर त्यांचा आणि भाजपाचा आत्मविश्वास बळावला असून ते सतत काँग्रेसवर हल्ला चढवताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील लोकांनी देशाच्या विकासाला सर्वोच्च स्थानी ठेवून भाजपा महायुतीला मतदान करावं. हरयाणा तर भाजपा जिंकली, आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे”, असे आवाहन मोदींनी केले. हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपचे लक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी डिजिटल माध्यमाने महाराष्ट्रात 7600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन केले. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटनही केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “काँग्रेसचा फॉर्म्युला फोडा आणि राज्य करा, असा आहे. त्यांच्या कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांनाही भडकावले.”
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेसचा फॉर्म्युला स्पष्ट आहे की, मुस्लिमांना घाबरवायचे, त्यांना भीती दाखवायची. त्याचे रुपांतर व्होटबँकेत करायचं. ती मजबूत करायची. काँग्रेसच्या एकाही नेत्यांने आजपर्यंत कधीही विचारलं नाही की, आपल्या मुस्लीम भाऊ-बहिणींमध्ये किती जाती असतात? मुस्लिमांमधील जातींचा विषय येताच काँग्रेस नेते तोंडाला कुलूप लावून बसतात; पण जेव्हा हिंदूंचा विषय येतो. तेव्हा काँग्रेस ही चर्चा जातींपासूनच सुरू करते.”
“हिंदू समाजातील एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत ठेवायचं, हे काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसला माहितीये की, जितकी हिंदूमध्ये फूट पडले, तितकाच त्यांना फायदा होईल. हिंदू समाजात आग भडकत राहावी, असे काँग्रेसला वाटत राहते. कारण त्यावर राजकीय भाकऱ्या भाजता येतील. भारतात जिथे कुठे निवडणुका होतात, तिथे काँग्रेस हा फॉर्म्युला अंवलंबते”, अशी टीका मोदींनी केली.
“आपली व्होटबँक मजबूत करण्यासाठी काँग्रेस समाजात द्वेष पसरवण्यासाठी अनेक गोष्टी करत आहे. हिंदू समाजात फूट पाडून त्याला विजयाचा फॉर्म्युला बनवणे, हाच काँग्रेसच्या राजकारणाचा आधार आहे. काँग्रेस भारताच्या सर्वजण हिताय, सर्वजण सुखायला नख लावत आहे”, असा घणाघाती हल्ला मोदींनी काँग्रेसवर चढवला.
“महात्मा गांधी म्हणाले होते की, काँग्रेसचं विसर्जन करायला हवे. पण, काँग्रेस स्वतः संपली नाही; आज देशाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपाल्याला सतर्क राहायचं आहे. मला विश्वास आहे की, समाजाला तोडण्याचे जे प्रयत्न आज होत आहेत, असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील.