CongresNewsUpdate : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आंतरवालीत…. काय आहे कारण ?

जालना : मराठा समाजाचा कुणबी म्हणून ओबीसी मध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी सरकार मागण्या मान्य करीत नसल्यामुळे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली आहे . या पार्श्वभूमीवर सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच , राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकले नाही.
दरम्यान जरांगे पाटील यांनी आधी घोषित केल्याप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी आपला निर्णय जाहीर करणार होते, मात्र विधानसभा निवडणुका पुढे गेल्यामुळे त्यांनीही निवडणूक लढवण्यासंदर्भातील घोषणेची तारीख पुढे ढकलली आहे. कोणतेही मोठे कारण नसताना राज्याची निवडणूक पुढे ढकलता यामागे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे . त्यामुळे आपण आधीच आपली रणनीती जाहीर केल्यामुळे त्यांना म्हणजेच भाजपला आपली रणनीती तयार करण्यासाठी वेळ मिळेल असे घडायला नको म्हणून जरांगे पाटील यांनी आपला निर्णय पुढे ढकलला आहे. त्यातच, आज पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरावाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षण व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना , त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मराठा आरक्षणासंदर्भाने काम केल्यामुळे या भेटीत आरक्षणावरच चर्चा झाल्याचे समजते. मात्र, निवडणुकांपूर्वी किंवा मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेपूर्वी चव्हाण यांनी जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय उलथापालथ तर होणार नाही ना, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
जरागेंनी सांगितले कारण …
निवडणुकांबाबत आपली मतदारसंघनिहाय रणनीती सुरू असून 29 ऑगस्टला आपण काय भूमिका घेतो हे सरकारला पाहायचे आहे. त्यांनी निवडणुका लांबवल्यामुळे आपल्याला 29 ऑगस्टची बैठक पुढे ढकलावी लागेल. यावेळेस जे होईल ते होईल,आपली रणनीती डाव प्रतिडाव कळू नयेत. निवडणुकीची घोषणा होण्याअगोदर आपण बैठक ठरवू. आपले डाव सरकारला का कळू द्यायचे? सर्वांना मराठा समाजाला सांगायचे, त्यांची निवडणूक तारीख जाहीर होईल तेव्हा बैठक घेऊ, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.
फडणवीसांनी राजीनामा द्यावा – चव्हाण
छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी आमची मागणी असल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. राज्यात सध्या विविध भागात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. या घटनावरुन विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका करताना दिसत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत विरोधक सरकारवर प्रहार करत आहेत. शातच आता पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.