बदलापूर अत्याचार प्रकरणात मावळची घटना चर्चेत, राजकारण थांबवा कुटुंबियांची मागणी, निकाल दोन महिन्यात नव्हे दीड वर्षाहून अधिक कालावधी..

पुणे : एकीकडे बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 3 वर्षीय चिरमुडींवर अत्याचार करण्यात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात असताना सत्ताधारी पक्षाकडून हे आंदोलन विरोधी पक्षाकडून करण्यात येत असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मावळमधील एका घटनेचा उल्लेख करीत आम्ही आरोपींना 2 महिन्यांच्या आत फाशी दिली, असे म्हटल्यानंतर मुख्यमंत्री दिशाभूल करीत असल्याचा आरोप कॉँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आले आहेत . मात्र, मावळमधील खटला प्रकरणातील निकाल येण्यासाठी दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला असल्याचे वृत्त एबीपी माझा ने दिले आहे. यावर , मावळमधील प्रकरण चर्चेत आल्यानंतर पीडित कुटुंबियांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना , कमीत कमी या गोष्टीचे तरी राजकारण करु नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्याच्या मावळमधील अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली, असा दावा केला त्यावर आता राजकारण सुरू झाले आहे. 2 ऑगस्ट 2022 ला मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मार्च 2024 मध्ये यातील आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) याला पुण्यातील विशेष न्यायालयाने २२ मार्च २०२४ रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच या प्रकरणात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीच्या आईलाही सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यात आमच्या बाबतीत सरकार आणि प्रशासनाने गांभीर्य दाखवले मात्र अद्याप या शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत आज पीडित मुलीच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर व्यक्त केली. आता यावरून जे राजकारण सुरू झालंय ते थांबवावं, अशी मागणीही पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीच फेक नरेटीव्ह पसरवतात, याचा पुरावा!
बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला दोन महिन्यात फाशी दिली, अस भर सभेत धडधडीत खोट बोलतात?!
मुख्यमंत्र्यांनी सांगावं महायुती सरकारच्या काळात दोन महिन्यात कोणत्या आरोपीला फाशी दिली?शिंदे – फडणवीस सरकार… pic.twitter.com/orAr24qRVF
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 22, 2024
काय आहे प्रकरण ?
बदलापुरात 3 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, हे प्रकरण तापलेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मावळमधील एका घटना फास्टट्रॅक चालवून आम्ही आरोपीला 2 महिन्यात फाशी दिली, असा दावा केला. मात्र, हे प्रकरण निकाली लावण्यासाठी 1 वर्ष 7 महिने लागले होते. मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावात असेच एक प्रकरण घडले होते. 2 ऑगस्ट 2022 रोजी 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आले होती. त्यानंतर 3 ऑगस्ट 2022 रोजी मृतदेह सापडला. कामशेत पोलिसांकडून आरोपीसह त्याच्या आईला 24 तासांच्या आत अटक करण्यात आली. जलदगीत न्यायालयाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. खटल्यात 29 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि उलटतपासणी करण्यात आली. 23 मार्च 2024 रोजी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली.
बदलापुरात घडलेली घटना निंदनीय असून या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी न्यायालयात करू असे जाहीर केले. तसेच माझ्या कालच्या भाषणातील वक्तव्याची फार चर्चा झाली मात्र मी जे बोलतो ते सत्य बोलतो असे सांगून सदर घटना ही मावळ तालुक्यातील कोथरूने गावातील असून या घटनेतील… pic.twitter.com/OSyZgCDlSg
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 22, 2024
एकनाथ शिंदे नेमके काय म्हणाले?
एकनाथ शिंदे म्हणाले, “विरोधक म्हणत होते की या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण योजना हवी. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो की तीन-चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात माझ्या एका बहिणीबरोबर अशीच एक घटना घडली. आम्ही तो खटला जलदगती न्यायालयात चालवला. पीडितेची बाजू मांडण्यासाठी विशेष वकील दिला. पोलिसांनी भक्कम खटला उभा केला, खूप मेहनत केली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली . त्यामुळे आमचे सरकार हे जनतेला न्याय देणारे आहे. त्यानंतर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या या दाव्यावर जोरदार टीका केली. दोन महिन्यात कुणाला फाशीची शिक्षा झाली, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे, असे आव्हान देण्यात आले. तर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर एसआयटी नेमा, असे सांगितले.
दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि इतर विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्या दाव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. या व्हिडीओतून त्यांनी या आरोपीचे नाव जाहीर करावे, असे आव्हान दिले होते. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सदर प्रकरणाचा उल्लेख केला.
यावर खा. संजय राऊत यांनी आरोपीला फाशी कुठे वर्षा बंगल्याच्या मागे दिली का ? असा खोचक सवाल विचारलं होता तर उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात एस आय टी स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाने ट्विट करीत उत्तर दिले आहे. मात्र यावर राजकारण न करण्याचे आवाहन पीडित चिमूरडीच्या कुटुंबियानी केले आहे.