काँग्रेसच्या त्या फुटीर आमदारांवर कारवाईचा बडगा , दोन दिवसात होणार कारवाई…

मुंबई : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याचं दिसून आले होते. या सातही आमदारांना पक्षातून निलंबित करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. या सातही आमदारांवर दोन दिवसात कारवाई होणार आहे. येत्या दोन दिवसात मल्लिकार्जुन खर्गे आणि के सी वेणुगोपाल या संदर्भात घोषणा करणार आहे.
विधानपरिषदेत निवडणुकीत ज्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक देखील झाली. या मागणीनंतर फुटीर आमदारांवर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसच्या या फुटीर आमदारांवर काय कारवाई करणार याची माहिती येत्या दोन दिवसांमध्ये पुढे येणार आहे. चंद्रकांत हांडोरे यांच्या निवडणुकीत मत फुटल्यानंतर या निवडणुकीत काँग्रेसने सावध भूमिका घेतली होती. या निवडणुकीत जे आमदार फुटलेले आहेत त्यांचे पुरावे काँग्रेसकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाला शिस्त लावण्यासाठी काँग्रेसचे हाय कमांड कठोर कारवाई करणार आहे.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 ते 8 मतं फुटल्याचे म्हटले जात आहे. ही काँग्रेसची मतं अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळाल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने उमेदवार प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीची 28 मते दिली होती. या 28 पैकी 3 आमदारांनी सातव यांना मतदान न करता महायुतीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने मिलिंद नार्वेकर यांना सहा मते दिली होती. यातील एक मत फुटल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. अशोक चव्हाण यांच्याबरोबर असलेले काही आमदार तसेच अन्य काही आमदारांची मतं फुटल्याचे म्हटले जात आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी मत फुटलेल्या संशयितांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचा हायकमांडकडे अहवाल सादर देखील करण्यात आला असून दोन दिवसात कधीही कारवाई होऊ शकते.