MVANewsUpdate : महाविकास आघाडीला राज्यात ४६ जागा मिळतील , खर्गे यांचा दावा

मुंबई : विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकी देणे , प्रादेशिक पक्ष हिसकावून घेणे , असे प्रकार सुरु आहे. सगळ्या यंत्रणांना हाताशी धरुन भाजप कुरापती करत आहे. परंतु आता लोकांनीच ही निवडून हातात घेतली असून त्यांची नाराजी मतपेटीतून पुढे येणार आहे. दरम्यान अनेक राज्यांमध्ये मोडतोड करुन सत्ता मिळवण्यात भाजपला यश मिळत असले तरी या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठे यश मिळणार आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी महाविकास आगाडीला कमीत कमी ४६ जागा मिळतील, असा मला विश्वास असल्याचा दावा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
इंडिया आघाडीच्या वतीने काल मुंबईत जाहीर सभा झाल्यानंतर आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खर्गे म्हणाले की, पंतप्रधानांच्या अनेक सभा आणि रोड शो होत आहे. ते जिथे जातात तिथे समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करतात. चुकीचा विचार लोकांसमोर मोडून नागरिकांना भडकावण्याचे काम करत आहेत. मी ५३ वर्षांपासून राजकारणात आहे. परंतु अशा पद्धतीचं राजकारण यापूर्वी कधीच बघितले नव्हते.
जीएसटीमध्ये बदल करून साधा सरळ टॅक्स लावणार…
”मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथेच आरबीआयचे कार्यालय आहे. परंतु जेव्हापासून मोदीजी आले आहेत तेव्हापासून या शहराला खाली खेचण्याचे काम त्यांनी केले. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही जीएसटीमध्ये बदल करणार असून साधा सरळ टॅक्स लावणार आहोत.”
शेवटी खर्गे म्हणाले की, देशामध्ये इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांसाठी महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून वर्षाला एक लाख रुपये दिले जातील, हा आमचा शब्द आहे. अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून पाच किलोच्या ऐवजी दहा किलो धान्य आम्ही देणार आहोत. ही योजनाच आम्ही आणली असून मोदीजींनी हे मान्य केलं पाहिजे.