मोदी मुस्लिम अल्पसंख्यांकावर बोलत असताना शेतकऱ्याने कांद्यावर बोला … अशा घोषणा दिल्याने क्षणभर उडाला गोंधळ !! मग मोदींनी दिल्या जय श्रीरामच्या घोषणा ….

दिंडोरी : दिंडोरी मतदार संघात भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारासाठी सभा घेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या मुद्यावरून बोलत असतानाच एका शेतकऱ्याने कांद्यावर बोला अशा घोषणा दिल्या. त्यानंतर पोलिसांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्या शेतकऱ्याला बाहेर काढले आणि पुन्हा मोदींचे भाषण सुरू झाले. या सभेत मोदींनी शरद पवार , कॉँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
“आम्ही देशात सरकार म्हणून जेव्हा योजना तयार करतो तेव्हा जात-पात धर्म पाहात नाही. ती योजना सगळ्यांसाठीच असते. सगळ्यांना योजनांचा लाभ मिळतो. मात्र काँग्रेसची नियत कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. नाशिक ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे त्यामुळे मी तुम्हाला विषय सांगतो आहे. काँग्रेसचा विचार असा आहे की देशातले सरकार जे बजेट तयार करते त्या बजेटमधला १५ टक्के भाग अल्पसंख्याकांसाठी ठेवावा.” दिंडोरीतल्या भाषणांत मोदी हे बोलत असतानाच समोरच्या गर्दीतून “कांद्यावर बोला.. कांद्यावर बोला.”, अशी घोषणा एका शेतकाऱ्यने देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभेत आलेला व्यत्यय पोलिसांनी त्या शेतकऱ्याला बाहेर काढत दूर केला. या शेतकऱ्याने दोन ते तीन वेळा घोषणा दिल्या. त्यानंतर मोदी एक क्षण थांबले, तेंव्हा समोरुन मोदी-मोदी अशा घोषणा येऊ लागल्या. त्यानंतर मोदींनी जय श्रीराम च्या घोषणा दिल्या. भारतमाता की जय या घोषणाही दिल्या. तसेच पुढे त्यांनी आपला मुद्दा पूर्ण केला. मोदींच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या या शेतकरी तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सभास्थळावरुन बाहेर नेलं.
धर्माच्या आधारे आरक्षण मिळू देणार नाही
धर्माच्या आधारावर बजेटचा एक हिस्सा मुस्लिम समाजासाठी असावा असे काँग्रेसला वाटतं आहे. मात्र मी हे होऊ देणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असेही नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले. तसेच धर्माच्या नावावर आरक्षणही दिले जाणार नाही असेही मोदी यांनी म्हटले आहे. वंचितांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहिजे. मोदी त्यासाठी चौकीदार म्हणून बसलो आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
दरम्यान माझे शेतकरी बांधव मला कधीच विसरणार नाहीत. काँग्रेस काळात शेतकऱ्यांसाठी खोटी पॅकेजेस जाहीर व्हायची. तुम्ही सांगा एक रुपया तरी मिळाला का ? आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांचे हितच पाहिले आहे. कांदा उत्पादन आणि द्राक्षं यांच्यासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. आमचे सरकार असे आहे ज्या सरकारने पहिल्यांदा कांद्याचा बफर तयार केला. आधीच्या सरकारांनी अशी व्यवस्था केली नव्हती. मागच्या सिझनमध्ये सात लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला. तसेच ५ लाख मेट्रिक टनचा बफर आम्ही तयार करतो आहोत. मागच्या दहा वर्षांत कांद्याची निर्यात ३५ टक्के वाढली आहे. दहा दिवसांपूर्वींच आम्ही कांदा निर्यातबंदी हटवली आहे असेही मोदी यांनी म्हटले आहे.