MIMNewsUpdate कोल्हापुरात वंचित पाठोपाठ एमआयएमचाही शाहू महाराजांना पाठिंबा
कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ या निवडणुकीत एमआयएमने पाठिंबा दिला असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांची ताकद चांगलीच वाढली आहे. एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी एमआयएम पक्षाची कोल्हापूर मतदारसंघासाठीची भूमिका स्पष्ट केली. आम्ही कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा देत आहोत, असे यावेळी जलील यांनी स्पष्ट केले.
गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मुस्लीम समाज मोठ्या संख्येने एमआयएमच्या पाठीशी उभा राहील होता. कोल्हापुरातही मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे एमआयएमच्या पाठिंब्यामुळे शाहू महाराजांची ताकद वाढणार आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनेदेखील या जागेवर आपला उमेदवार उभा केलेला नाही. वंचितने या जागेवर छत्रपती शाहू महाराजंना बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
संजय मंडलिक यांच्याशी थेट लढत
दरम्यान कोल्हापूरच्या जागेवर महायुतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय मंडलिक यांना तिकीट दिले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ते पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. त्यामुळे येथे छत्रपती शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात थेट लढत होणार आहे. मंडलिक विजयी व्हावेत यासाठी महायुतीने या जागेवर संपूर्ण यंत्रणा लावली आहे. त्यामुळे आता येथून कोण विजयी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश व्हावा यासाठी मविआच्या नेत्यांनी बरेच प्रयत्न केले. गेल्या काही महिन्यांत त्यासाठी वंचितचे आणि मविआच्या नेत्यांत अनेक बैठका झाल्या. मात्र शेवटपर्यंत या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी आता वंचित बहुजन आघाडीने वेगवेगळ्या मतदारसंघावर आपले उमेदवार उभे केले आहेत. मात्र वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मात्र कोल्हापूरच्या जागेवर कोणताही उमेदवार दिलेला नाही. त्यांनी येथे छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आंबेडकरी मतदार तसेच बहुजनांचाही पाठिंबा शाहू महाराजांना मिळण्याची शक्यता आहे.
औरंगाबादेत चौरंगी लढत , चंद्रकांत खैरे म्हणतात माझी लढाई एमआयएमशी , डुप्लीकेट सेनेशी नाही..
औरंगाबाद : शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, एमआयएमकडून इम्तियाज जलील तर शिवसेना शिंदेकटाकडून संदिपान भूमरे तर वंचित बहुजन मतदार संघातून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे . त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीचे विशेष म्हणजे शिवसेना फुटीनंतर यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी पहिल्यांदाच चुरशीची लढत होणार आहे.
यासंदर्भात बोलताना, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे की , ती (शिवसेना (शिंदे)) शिवसेना नाहीच, आमचीच शिवसेना पक्की आहे. ती शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे. चोरलेली शिवसेना आहे, परंतु विरोधकांना कधीही कमी न समजता, ते खूप मोठे आहेत आणि आपल्याला त्यांना पराभूत करायचे, साफ करायचे या ईर्षेने आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागलेलो आहोत. हा शिवसेना प्रमुखांचा गड असल्याने हा कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व एकनिष्ठांचे नेतृत्व आहे. गद्दार विरुद्ध एकनिष्ठ, निष्ठावान, ही लढाई होणार. औरंगाबादची जनता कधीही गद्दारांना जवळ करत नाही, माफही करत नाही, गद्दारांना मातीत टाकते.
माध्यमांशी बोलताना खैरे पुढे म्हणाले की , ती शिवसेना नाहीच, आमचीच शिवसेना पक्की आहे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना. ती शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे. चोरलेली शिवसेना आहे. धनुष्यबानही चोरला. सगळं काही चोरलं. मुळ शिवसेना लोकांना माहीत आहे. तसेच, आपली लढाई एमआयएमसोबत असल्याचेही खैरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की , “संदिपान भुमरे हे आव्हान असेल असे वाटत नाही. आमची लढत एमआयएम सोबत होईल, असे मला आताच्या घडीला तरी वाटते. भविष्यात सांगता येत नाही. पण आताच्या घडीला पाहिले तर एमआयएम सोबतच खैरे साहेबांची म्हणजेच आमच्या शिवसेनेची फाइट होइल असे दिसते.”