औरंगाबादेत चौरंगी लढत , चंद्रकांत खैरे म्हणतात माझी लढाई एमआयएमशी , डुप्लीकेट सेनेशी नाही..
औरंगाबाद : शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे, एमआयएमकडून इम्तियाज जलील तर शिवसेना शिंदेकटाकडून संदिपान भूमरे तर वंचित बहुजन मतदार संघातून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे . त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. या निवडणुकीचे विशेष म्हणजे शिवसेना फुटीनंतर यावेळी शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी पहिल्यांदाच चुरशीची लढत होणार आहे.
यासंदर्भात बोलताना, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे की , ती (शिवसेना (शिंदे)) शिवसेना नाहीच, आमचीच शिवसेना पक्की आहे. ती शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे. चोरलेली शिवसेना आहे, परंतु विरोधकांना कधीही कमी न समजता, ते खूप मोठे आहेत आणि आपल्याला त्यांना पराभूत करायचे, साफ करायचे या ईर्षेने आम्ही सर्व शिवसैनिक कामाला लागलेलो आहोत. हा शिवसेना प्रमुखांचा गड असल्याने हा कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व एकनिष्ठांचे नेतृत्व आहे. गद्दार विरुद्ध एकनिष्ठ, निष्ठावान, ही लढाई होणार. औरंगाबादची जनता कधीही गद्दारांना जवळ करत नाही, माफही करत नाही, गद्दारांना मातीत टाकते.
माध्यमांशी बोलताना खैरे पुढे म्हणाले की , ती शिवसेना नाहीच, आमचीच शिवसेना पक्की आहे. बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना. ती शिवसेना डुप्लिकेट शिवसेना आहे. चोरलेली शिवसेना आहे. धनुष्यबानही चोरला. सगळं काही चोरलं. मुळ शिवसेना लोकांना माहीत आहे. तसेच, आपली लढाई एमआयएमसोबत असल्याचेही खैरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की , “संदिपान भुमरे हे आव्हान असेल असे वाटत नाही. आमची लढत एमआयएम सोबत होईल, असे मला आताच्या घडीला तरी वाटते. भविष्यात सांगता येत नाही. पण आताच्या घडीला पाहिले तर एमआयएम सोबतच खैरे साहेबांची म्हणजेच आमच्या शिवसेनेची फाइट होइल असे दिसते.”