VBANewsUpdate : वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांचा मोठा निर्णय , महाविकास आघाडीतून बाहेर पडत ७ उमेदवारांच्या नावाची घोषणा …

अकोला : राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत सामाजिक युती करीत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहेत. आज त्यांनी आपले ८ उमेदवार जाहीर करीत नागपूरच्या जागेवर काँग्रेसला तर सांगलीत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
लोकसभेसंदर्भात आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आंबेडकर यांनी अकोल्याचे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत 30 मार्चनंतर निर्णय घेतील असेही आंबेडकरांनी सांगितले.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी महाविकास आघाडीतून ते बाहेर पडले आहेत का? याबाबत त्यांनी उत्तर देणे टाळले. आज फक्त उमेदवारांची घोषणा करत आहे. प्रश्नोत्तरांना उद्या उत्तर देईल, असेही त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगतिले.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ?
यावेळी पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले की, “काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत. काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला. मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली.
जरांगे आणि दोघे मिळून लढणार”
“सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे. नवी आघाडी करतांना आमच्यावर टीका होईल. आरोप होतील. शेती, किमान आधारभूत मूल्य, कृषी आधारीत उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जावू. जरांगे पाटलांसोबची नवी मैत्री हे सामाजिक गठबंधन. लोक हे स्वीकारतील. ओबीसींना आतापर्यंत खूप कमी वाटा मिळाला आहे. ओबीसी, भटके-विमुक्तांना अधिकाधिक उमेदवारी देणार. भाजपने मुस्लिमांना वेगळं पाडण्याचे जे राजकारण सुरू केलं त्याला उत्तर म्हणून मुस्लीम उमेदवार देणार. जैनांनाही प्रतिनिधित्व देणार.”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
“ही राजकारणातील नवी वाटचाल. या वाटचालीला समूह पाठींबा देईल. राजकारण आणि निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर. यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी मतदारांसोबत न राहता डोनेशन देणाऱ्यांसोबत राहते. यामुळे कार्यकर्त्यांनी स्वत:च्या खर्चाने प्रचार करावा. कमीत कमी पैशात उमेदवाराने निवडणूक लढवावी हा प्रयत्न.”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर
भंडारा-गोंदिया : संजय केवट
गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी
चंद्रपूर : राजेश बेले
बुलडाणा : वसंतराव मगर
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार