Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VBA News Update : पवार, ठाकरे यांच्यावरील विश्वास उडाला, प्रकाश आंबेडकरांचे काँग्रेसला मैत्रीचे पत्र…

Spread the love

मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वर्तणुकीला कंटाळून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून 7 जागांवर काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देण्याची भूमिका मांडली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या पत्रामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे.

आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी  आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून  एकमत होतांना पाहायला मिळत नसून, त्यातूनच प्रकाश आंबेडकरांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे  यांना हे पत्र लिहले आहे. राज्यातील सात मतदारसंघांमध्ये काँग्रेसला पूर्णपणे पाठिंबा वंचित बहुजन आघाडी देईल, असे आंबेडकरांनी खरगे यांना पत्रातून प्रस्ताव दिला आहे. तर, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीसाठी किंवा चर्चेसाठी निमंत्रित न करता डावलण्यात येत असल्याचे देखील आंबेडकर  यांनी म्हटले आहे.

दरम्यान त्यामुळे आमचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) या दोनही पक्षावरील विश्वास उडाला असल्याचे आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी मलिकार्जुन खरगे यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, “17 मार्च रोजी मुंबईतील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आम्ही सविस्तर संभाषण करू शकलो नाही, त्यामुळे आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेतल्या जात आहे.

या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. महाविकास आघाडीत वंचितला समान न्याय न देण्याच्या वृत्तीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा भाजप, आरएसएस, फुटीरतावादी आणि लोकशाही संपवणाऱ्या विरोधात आहे. या विचाराने आम्ही महाराष्ट्रातील 7 जागांवर काँग्रेसला वंचितचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शेवटी त्यांनी म्हटले आहे की, तुम्हाला विनंती आहे की,  मला महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या कोट्यातील 7 मतदारसंघांची नवे द्यावीत, आमचा पक्ष तुमच्या पसंतीच्या या 7 जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना पूर्ण पाठींबा देईल. वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छ नाही तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा विस्तारही असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!