MaharashtraPoliticalUpdate : मंत्रिमंडळ विस्तार : कोणाला मिळणार डच्चू ? आणि कोण दोन जाणार केंद्रात ?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल अचानक दिल्लीत गेले. या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते मध्यरात्री उशिरा मुंबईत आले. या नेत्यांनी सुमारे तीन ते चार तास अमित शाह यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्रामध्ये तसेच राज्यात देखील मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तारातून काही अकार्यक्षम मंत्र्यांना वगळले जाणार असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर अशा मंत्र्यांची नावे देखील समोर आली आहेत. शाह यांच्या बैठकीत शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदिल देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे सरकारमधील कामचुकार आणि वाचाळवीर मंत्र्यांना डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे. तशा स्पष्ट सूचनाच याआधी शाह यांनी शिंदे यांना दिल्या होत्या. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या विस्तारात मित्र पक्षांनाही स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या मंत्र्यांची पदे धोक्यात..
काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर भाजपमधील वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती. यानंतर शिंदे गटालीत काही मंत्र्यांची पदे जाणार असल्याचे देखील बोलले जात होते. यादरम्यान सुत्रांकडून राज्यातील मंत्रीपद अडचणीत असलेल्या नेत्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार (कृषी मंत्री), संदीपान भुमरे (रोजगार हमी व फलोत्पादन) आणि संजय राठोड (अन्न व औषध प्रशासन) यांचं मत्रीपद धोक्यात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान केंद्रापाठोपाठ महाराष्ट्रात अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील भाजपच्या महाराष्ट्रातील दोन अकार्यक्षम मंत्र्यांच्या जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. यामध्ये एक कॅबिनेट, तर एक राज्यमंत्री पदाचा समावेश असेल आणि हे पद कोणाला द्यायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवला आहे.