MaharashtraPoliticalUpdate : शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची वक्र दृष्टी
नाशिक : शिंदे फडणवीस मंत्रिमंडळातील शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत भाजपाकडून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ब्रेक लागला आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल तेव्हा दोन्ही गटात मारामाऱ्या झालेल्या दिसतील,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केले आहे.
यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वारंवार दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागत आहेत. कारण अमित शाहांनी सांगितलं आहे की, तुमच्या मंत्रिमंडळातील संजय राठोड, संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार व गुलाबराव पाटील या वादग्रस्त मंत्र्यांना आवर घाला किंवा यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही मंत्रीमंडळ विस्तार करणार नाही. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जात आहेत.”
“अब्दुल सत्तारांबद्दल केंद्रात प्रचंड नाराजी”
“एकनाथ शिंदे जोपर्यंत या पाच मंत्र्यांची हकालपट्टी करत नाहीत. विशेषतः अब्दुल सत्तारांबद्दल केंद्रात प्रचंड नाराजी आहे. देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्ट सांगितले आहे की, त्यांच्यामुळे भाजपाची प्रतिमाही डागाळली आहे. परवा गिरीश महाजन यांनी एक वक्तव्य केले. त्यात त्यांनी १० मंत्रीपदे आम्ही देऊ अर्थात कुणाला मंत्रीपद द्यायचे याचे अधिकार एकनाथ शिंदेंना असतील, असेही अमोल मिटकरींनी म्हटले आहे.