MaharashtraAssemblyUpdate : अधिवेशन संपले , समजून घ्या काय झाले अधिवेशनात ?
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सहा दिवसानंतर संस्थगित करण्यात आले आहे. आता हिवाळी अधिवेशन सोमवार दि. १९ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे घेण्यात यावे अशी शिफारस सभागृहाने राज्यपालांकडे केली आहे. महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर झालेल्या या अधिवेशनात शिवसेना आणि शिवसेना बंडखोर यांच्यात चांगलेच घोषणायुद्ध झाले अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधारी आघाडीच्या आमदारांनीही प्रति आंदोलन केले.
या अधिवेशनाची माहिती देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले कि , विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ६ बैठका, एकूण कामकाज ५७ तास २५ मिनिटं, अन्य कारणामुळे वाया गेलेला वेळ निरंक, रोजच्या कामकाजाचे तास सरासरी ९ तास २५ मिनिटे, एकूण प्रश्न ४ हजार ८१५, स्वीकृत प्रश्न २५१, सभागृहात उत्तरीत झालेले प्रश्न २२, लक्षवेधी सूचना ८६२, नियम ५७ च्या सूचना २२, संमत करण्यात आलेली विधेयकं १०, विधान परिषदेत एकही विधेयक संमत करण्यात आले नाही. नियम २९३ अन्वये २ मुद्दे चर्चेत आले. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीवर ११ मुद्दे उपस्थित करण्यात आले.
राहुल नार्वेकर यांची मोठी घोषणा
दरम्यान अधिवेशनाची सांगता करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी घोषणा केली. याबाबत बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, अधिवेशन काळात विधान भवन परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सदस्यांनी एकमेकांविषयाच्या आदर भावनेला धक्का पोहचू नये यासाठी विधान भवनात पाळण्याची शिस्त, शांतता सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यासाठी समितीचं गठन करण्यात आले आहे.
या समितीत विधानसभा अध्यक्ष, उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संसदीय कार्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, हितेंद्र ठाकूर, प्रविण दरेकर, अनिल परब, अमर राजूरकर, शशिकांत शिंदे, जयंत पाटील(शेकाप), कपिल पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
अधिवेशन समारोप प्रसंगी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी , भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाईल अशी घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले कि , राज्यातील विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी ७५ हजार रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदसंख्येत आणखी काही हजारांत वाढ होण्याची शक्यता आहे.
गुन्हेगारीत घट होत आहे …
दरम्यान मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कारशेड आरे येथेच उभारले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती. आणखी एक वर्ष मालमत्ता करात वाढ केली जाणार नाही असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्यातील गुन्हेगारीत घट झाली असल्याचे सांगून ते म्हणाले कि , गुन्हे प्रकटीकरणात वाढ होत आहे. पोलीसांनी मुस्कान अभियानामधून राज्यातील सुमारे ३७ हजार ५११ मुले आणि मुलींचा शोध घेऊन पालकांकडे सुपूर्द केली आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीसांनी कठोर कारवाई केली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
पोलिसांना मिळणार पंधरा लाखांत घर…
बीडीडी चाळीचा पुनर्विकास गतीने पूर्ण केला जाईल. या पुनर्विकास इमारतींमध्ये पोलीसांना केवळ पंधरा लाख रुपयांत घर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पोलिसांना अधिक घरे उपलब्ध व्हावीत यासाठी गृहनिर्माण धोरणात विशेष तरतूद केली जाईल. पोलिसांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. न्यायालयीन विकासासाठी दरवर्षी भरीव निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना भरीव मदत
या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी मोठा आवाज उठवला याबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले कि , अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत तात्काळ दिली आहे. पूर्वी ही मदत केवळ पाच हजार रुपये होती. ती मदत आता पंधरा हजार रुपये दिली जात आहे. गावांचे शहराशी दळणवळण वाढायला मदत व्हावी यासाठी रस्ते विकासासाठी प्राधान्याने काम केले जाणार आहे असंही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.