IndiaPoliticalUpdate : हरियाणात नेमकं काय झालं ? काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिव्हारी लागणार पराभव….

चंडीगड – चार राज्यांमध्ये झालेल्या राज्यसभेच्या १६ जागांसाठीच्या निवडणुकीत सनसनाटी निकाल लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील एक निकाल शिवसेनेसाठी तर हरयाणामधील निकाल हा काँग्रेससाठी धक्का देणारा ठरला आहे. विशेष म्हणजे हरयाणात काँग्रेसला एक उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक संख्याबळ असूनही पराभव पत्करावा लागला त्यामुळे हा पराभव काँग्रेससाठी जिव्हारी लागणारा ठरला आहे .
हरियाणा बद्दल बोलायचे झाल्यास काँग्रेसच्या या पराभवाचे कारण राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे कुलदीप बिश्नोई यांच्यामुळेच काँग्रेसचे दिल्लीतील बडे नेते अजय माकन पराभूत झाले असे सांगण्यात येत आहे . अगदी अटीतटीच्या लढतीत माकन यांना भाजपाच्या पाठिंब्यावर लढत असलेले अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी पराभूत केले.
रिटर्निंग ऑफिसर आर.के. नंदल यांनी सांगितले की, भाजपाचे कृष्णलाल पवार यांना ३६ मते मिळाली. तर कार्तिकेय शर्मा यांना पहिल्या प्राधान्यक्रमाची २३ मते मिळाली. तर ६.६ टक्के मते ही भाजपाकडून त्यांना ट्रान्सफर झाली. त्यामुळे त्यांची एकूण मतसंख्या २९.६ एवढी झाली. अजय माकन यांना २९ मते मिळाली. मात्र दुसऱ्या प्राधान्यक्रमाचं एकही मत न मिळाल्याने माकन यांचा पराभव झाला.
राज्यसभा निवडणुकीत एक मत हे १०० च्या बरोबरीचे मानले जाते. हरियाणामध्ये एकूण ९० आमदारांमधील ८९ आमदारांनी मतदान केले मात्र अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदान केले नाही. शिवाय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे एक मत रद्द केले होते . त्यामुळे ८८ मते उरली होती. ८८०० एवढे या मतांचे मूल्य होते.
त्यामुळे विजयासाठी ८८००/३+१ म्हणजेच २९३४ मतांची गरज होती. भाजपाचे कृष्णलाल पवार यांच्या विजयानंतर ६६ मतं उरली. ती कार्तिकेय शर्मा यांना ट्रान्सफर करण्यात आली. कार्तिकेय शर्मा आणि अजय माकन यांना प्रत्येकी २९ मते मिळाली. इथपर्यंत दोघेही बरोबरीत होते. मात्र भाजपाला ६६ मतं मिळाल्यानंतर कार्तिकेय यांची मतं २९६६ झाली त्यामुळे त्यांचा विजय झाला. काँग्रेसमधील क्रॉस व्होटिंग आणि एक मत अवैध झाल्याने संपूर्ण बाजीच पलटून गेली.