CoronaIndiaUpdate : सावधान , देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पण वाढत आहे मृत्यूचे प्रमाण

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट होत असली तरी गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांचे आकडे पुन्हा एकदा चिंता वाढवणारे ठरत आहेत. एका दिवसात देशात कोरोनामुळे ५०० हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नसल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. दरम्यान गुजरातमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात १२,५१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानंतर एकूण रुग्णांची संख्या आता ३,४४,१४,१८६ वर पोहोचली आहे तर देशात सध्या १,३७,४१६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २६७ दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ५०१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत मृत्यूंचा आकडा ४,६२,६९० वर पोहोचला आहे. सलग ३५ व्या दिवशी देशात कोरोना रुग्णांची संख्या २० हजाराहून दिसून आले आहेत.
दरम्यान गुजरातमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गुजरातमध्ये ४२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण गुजरातमध्ये दिवसामागे रुग्णवाढ १० हून कमी झाली होती. पण आता एका दिवसात ४० च्यावर रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ९९७ रुग्ण आढळून आले आहेत. तर २८ जणांचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगडमध्ये गेल्या २४ तासांत २६ रुग्ण आढळून आले आहेत. राजधानी दिल्लीत गेल्या २४ तासांत ४० रुग्ण आढळून आले आहेत.