CoronaMaharashtraUpdate : अधिकच्या तीन कोटी लसींचे डोसबरोबरच औषधांच्या किमती कमी करून ऑक्सिजनचा पुरवठा करा : मुख्यमंत्री

मुंबई : ‘करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेचा उद्योगांना फटका बसू नये म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, राज्याला लसीचे जास्तीत जास्त डोस मिळणे गरजेचे आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील मिळून ८ ते १० जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग सुरू आहे. या जिल्ह्यांतील १८ वर्षांपुढील २.०६ कोटी जणांना लसीचे दोन्ही डोस देणे आवश्यक आहे. सध्या इथे ८७.९० लाख डोस दिले गेले आहेत. त्यामुळं अधिकचे ३ कोटी डोस मिळावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.
मोनोक्लोनल एन्टीबॉडीज हे सध्या उपचारांमध्ये प्रभावी आहे मात्र त्याची किंमत ५० ते ६० हजार प्रती डोस असून तिसऱ्या लाटेत ५० हजार रुग्णांना जरी हे औषध द्यायचे म्हटले तर ३०० कोटी रुपये लागतील, याचा विचार करून केंद्र सरकारने या औषधांच्या किंमतीवर नियंत्रण आणून ते सहज उपलब्धता होईल हे पाहावे, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.
त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेत राज्याला दररोज सुमारे ४ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आवश्यकता भासेल, असा केंद्राचा अंदाज आहे. आम्ही २ हजार मेट्रिक टन उत्पादन करू शकतो. उर्वरित २ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन नजीकच्या राज्यातून आला तर मोठी मदत होईल. भिलाई, जामनगर, बेल्लारी स्टील प्लांट या ठिकाणाहून महाराष्ट्राला एलएमओ मिळण्यासाठी केंद्रानं साहाय्य करावं,’ असे ही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
‘करोनाचा धोका कायम असतानाही महाराष्ट्रासह देशभरात लोक घराबाहेर पडत आहेत. गर्दी करत आहेत. रिव्हेंज टूरिझम, रिव्हेंज शॉपिंग सुरू झाले आहे. धार्मिक, राजकीय कारणांसाठी गर्दी होऊ लागली आहे. हे थांबविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहेच, पण राष्ट्रीय पातळीवर देखील याबाबत व्यापक धोरण आखले जावे ,’ अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.