माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणे सुनियोजित षडयंत्र – पंतप्रधान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आपले उत्तर दिले. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी गोंधळ घातला. यानंतर संतापलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना समज देऊन काँग्रेसला टोला लगावला.
हे सभागृह आणि सरकार आंदोलक शेतकऱ्यांचा आदर करतं असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. सोबतच दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलकांमध्ये अफवा परवल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी म्हणाले की, “सातत्याने शेतकऱ्यांशी बातचीत सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर चर्चा केली आहे. 21 व्या शतकामध्ये 18 व्या शतकाच्या विचारांसह कृषी क्षेत्राच्या आव्हानांचा सामना करू शकत नाही. जिथे बदलाची गरज आहे त्यावर विचारही केला. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आमचा शुद्ध हेतू आहे.” स्वीकारणे / नाकारणे हे आपल्यावर अवलंबून आहे. हे अनिवार्य नाही. हुंड्याविरूद्ध कायद्याची मागणी कोणीही केली नव्हती, तरीही ती देशाच्या प्रगतीसाठी बनविली गेली. तसेच प्रगतीसाठी तिहेरी तलाक आणि बालविवाहाविरूद्ध कायदे करण्यात आले. तसेच आम्हाला कृषी कायदे बदलावे लागेल.
नवे कृषी कायदे लागू झाल्यानंतर कोणतीही मंडई बंद झाली नाही, शेती कायदे अध्यादेशाद्वारे आणि नंतर संसदेद्वारे पारित केले गेले.असा दावा मोदींनी आपल्या भाषणात केला. दरम्यान पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. सुरुवातीला मस्करीत काँग्रेस खासदारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदींनी नंतर मात्र त्यांना चांगलीच समज दिली. हे योग्य नाही, माझ्या मनात तुमचा आदर आहे. तुम्हाला बोलण्याची संधी देण्यात आली होती. आता गोंधळ थांबवा, असे मोदींनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना सांगितले. तसेच माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणे ही सुनियोजित रणनीती असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पतंप्रधान मोदींचे भाषण सुरु असतानाच काँग्रेस आणि टीएमसी खासदारांनी सभात्याग केला. यानंतर मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. “काँग्रेस न स्वत:चं भलं करु शकते ना देशाचं. काँग्रेस खासदारांची राज्यसभेत वेगळी भूमिका असते आणि लोकसभेत वेगळी भूमिका असते, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते?” असे मोदी म्हणाले.
सभात्याग केल्या नंतर कॉंग्रेसचे अधीर चौधरी म्हणाले, आम्ही सभागृहातून बाहेर पडलो कारण पंतप्रधानांनी शेतकर्यांच्या मृत्यूबद्दल, आमच्या चिंतांबद्दल चर्चा केली नाही. त्यांनी मान्य केले की शेतकरी कायद्यात दुरुस्ती आवश्यक आहेत, त्याचा काही राज्यांना फायदा होईल आणि काहींना होणार नाही. मग, जो कायदा सर्वांनाच लाभदायक ठरणार नाही त्यांना असा कायदा का आणायचा आहे? असे कॉंग्रेसचे अधीर चौधरी माध्यमांशी बोलताना म्हणाले
याआधी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (8 फेब्रुवारी) राज्यसभेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी नव्या कृषी कायद्यांची पाठराखण केली होती. लोकसभेतील भाषणातही मोदींनी कृषी कायद्यांचे समर्थने केले.