JalnaNewsUpdate : हृदयद्रावक : तीन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पाळसखेड पिंपळे येथील तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे . हे तिघेही जण पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते . दरम्यान विहिरीवरील मोटार चालू करताना एका भावाला विजेचा धक्का बसून तो विहिरीत पडला आणि त्याला वाचवण्यासाठी दोन्हीही भावांनी उड्या मारल्यामुळे त्यांचेही या दुर्घटनेत निधन झाले. या पैकी एका भावाचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता.
या विषयी माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , पाळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय २७), रामेश्वर आप्पासाहेब जाधव (वय २४) व सुनील आप्पासाहेब जाधव (वय १८) हे तिघे भाऊ १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता जेवण करून शेतात गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी दोन दुचाकी घेऊन गेले होते. एक जण विद्युत पंप सुरू करत असताना त्याला करंट लागले व तो विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी दोघांनी विहिरीत उडी मारली. मात्र, अंधार असल्याने या तिन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे तिघे घरी आले नाहीत म्हणून त्यांचे आई-वडील व धानेश्वरची पत्नी चिंतेत होती. शिवाय मोबाईल फोन कोणीही उचलत नव्हते म्हणून त्यांनी नातेवाईकांना सांगितले. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी शेतात जाऊन त्यांचा शोध घेतला असता , त्यानंतर रात्री २ ते ३ च्या दरम्यान ते विहिरीत पडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच हसनाबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला.
या दुर्घटनेमुळे पळसखेड पिंपळे गाव आणि परिसरात शोककळा पसरली आहे . आप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत. त्यापैकी ज्ञानेश्वरचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता तर इतर दोन मुलगे औरंगाबाद येथे कंपनीत कामाला होते. लाकडाऊनमध्ये ते घरी आले होते.