MaharashtraNewsUpdate : या अधिवेशनाने सामान्य, गरीबांच्या तोंडाला पाने पुसली , देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका
“या अधिवेशनाने सामान्य, गरीबांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. आम्ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सहकार्याची भावना ठेवली. मात्र सत्तारुढ पक्षाकडून फक्त राजकारण करण्यात आलं. कोणत्याही घटकाला दिलासा या अधिवेशनातून मिळालेला नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपल्यानंतर दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या माझे कुटुंब,माझी जबाबदारी योजनेवर बोलताना ते म्हणाले की, “आपापल्या कुटुंबाची जबाबदारी आपण घेऊ. पण सरकार काही जबाबदारी घेणार आहे की नाही? दवाखान्यात बेड्स नाहीत, रुग्णवाहिका, व्हेटिंलेटर मिळत नाहीत. अनेक लोकांना जीव गमवावा लागत असून त्यांची जबाबदारी कोण घेणार ? संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं कुटुंब आहे ते सरकार मात्र जबाबदार घेणार नाही. ते हात झटकतील. असं कसं चालेल…आम्ही या मोहिमेतही सहकार्य करु. पण कमतरता दूर करण्याचं काम सरकारने केलं पाहिजे”.
राज्याचे दोन दिवसीय अधिवेशन संपल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली . रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आणलेल्या हक्कभंग प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आपण दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नीट केला नाही तेव्हा हक्कभंग आणला जातो त्याचवेळी सामनासारख्या दैनिकात राज्यपालांचा उल्लेख कसा होतो, पंतप्रधानांचा उल्लेख कसा होतो याचाही विचार करण्याची गरज आहे. दुटप्पी भूमिका असू शकत नाही, सारखी भूमिका घेतली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान अधिवेशनावर बोलताना फडणवीस पुढे म्हणाले कि , अधिवेशन लवकरात लवकर कसं संपेल ? तसंच पुरवणी मागण्यांवर कमीत कमी चर्चा व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न करण्यात आले. विरोधी पक्षातून १० ते १२ लोक बोलणार होते. पण एकच भाषण झालं आणि त्यालाही उत्तरं देण्यात आली नाहीत. ज्या प्रकारे कोरोना वाढत आहे त्यावरील उपाययोजना सांगण्यात आल्या नाहीत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. “मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ हजार अधिक मृत्यू झाले आहेत.सरकार केवळ सात हजार मृत्यू झाल्याचं सांगत असून मग उर्वरित साडे सात हजार मृत्यू कुठचे आहेत? अद्यापही साडे पाचशे मृत्यू घोषित केलेले नाहीत. राज्य सरकारनं उर्वरित महराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा,” आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. शेतकरी, पुराच्या मुद्द्यावर सरकार गप्प असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.