IndiaNewsUpdate : सुरक्षित वावराच्या नियमाचे पालन हाच कोरोनावर उपाय , करोनामुक्त ४० टक्के व्यक्तींच्या ‘अँटिबॉडीज’ झाल्या नष्ट !!

देशात सर्वत्र कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांच्या ‘अँटिबॉडीज’ वर चर्चा होत असतानाच अहमदाबाद शहरातील करोनामुक्त झालेल्या जवळपास ४० टक्के रुग्णांतील ‘अँटिबॉडीज’ नष्ट झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. अहमदाबाद महानगरपालिकेने शहरात केलेल्या ८०० बऱ्या झालेल्या रुग्णांच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. अहमदाबाद जिल्ह्यात आजवर तब्बल ३२ हजार १३ करोना रुग्णांची नोंद झालेली असून त्यापैकी १,७४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
या बाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाविन सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च आणि जुलैदरम्यान केलेल्या अँटिजेन चाचण्यांच्यावेळी करोना झाल्याचे निदान झाले अशा १८०० व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी ४० टक्के बऱ्या झालेल्या रुग्णांमधील अँटिबॉडीज नष्ट झाल्या आहेत. त्यापैकी अनेकांना बरे होण्यासाठी दीर्घकाळ लागला, असे सांगितले. अँटिबॉडीज नष्ट झाल्यामुळे अशा व्यक्तींमध्ये भविष्यात पुन्हा कोव्हिड-१९ होण्याची अधिक असते, अशी शक्यताही सोलंकी यांनी व्यक्त केली. जोपर्यंत बाजारात करोनावरील लस उलब्ध होत नाही, तोपर्यंत सुरक्षिततेचा उपाय म्हणून सुरक्षित वावराचा नियम पाळणे आणि मास्क वापरणे गरजेचे आहे, असाही सल्ला सोलंकी यांनी दिला आहे.