MarathawadaNewsUpdate : ऑनलाईन क्लाससाठी टॅब मिळाला नाही म्हणून विद्यार्थ्यांची आत्महत्या

अलीकडच्या काळात सर्वत्र ऑनलाईन शिक्षणाचे कौतुक चालू असताना वडिलांनी टॅब घेऊन दिला नाही. त्यामुळे ऑनलाईन क्लास बुडत असल्याने हताश झालेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभिषेक राजेंद्र संत असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. गेवराई तालुक्यातील भोजगाव येथे ही घटना घडली. अभिषेकनं यंदा दहावीची परीक्षा दिली असून त्याचे वडील शेतकरी आहेत.
अभिषेकने 10 वी नंतर पुढे काय करावं, यासाठी ऑनलाईन क्लास लावला होता. मात्र, क्लाससाठी टॅब कम्पलसरी असल्याचं अभिषेकनं घरी सांगितलं होतं. ऑनलाईन क्लास बुडतो म्हणून त्यानं वडिलांकडे टॅब घेऊन द्या, अशी मागणी केली होती. मात्र, सध्या खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. पेरणी झाल्यावर टॅब घेऊन देतो, असं शेतकरी वडिलांनी अभिषेक याला सांगितलं होतं. मात्र, अभिषेक हट्टाला पेटला होता. त्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे अभिषेकच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. ज्याच्यासाठी पिता शेतात काबाडकष्ट करत होता, आता तोच मुलगा सोडून गेल्यानं शेतकरी बाप पूरता खचला आहे.
अभिषेकने यंदा दहावीची परीक्षा दिली असून पुढील महिन्यात त्याचा निकाल येणार आहे. अभिषेक हा शेतकरी कुटुंबातील होता. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक अडचण आहे. त्यात पेरणीचे दिवस सुरू असल्यानं बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अभिषेकच्या आत्महत्येप्रकरणी गेवराई पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला. पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.