#PalgharMobLynching : गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले , राजकारण करू नका , आरोपींमध्ये एकही मुस्लिम नाही…

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 22, 2020
राज्यातील पालघर येथील घटना देशभर चर्चेचा विषय झाली असून यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेचे राजकारण करणारांवर टीका करताना म्हटले आहे कि , राज्यात करोनाचं मोठं संकट आहे. या संकटाचा एकजुटीने सामना करण्याचं सोडून काही लोक पालघरच्या घटनेचं जातीचं राजकारण करून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, दरम्यान पालघर हत्याकांडात एकही मुस्लिम आरोपी नसल्याचही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
पालघर येथील या घटनेसंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्विटर लाईव्हवरून जनतेशी संवाद साधत पालघर आणि वाधवान प्रकरणावर भाष्य केलं. पालघरमध्ये दोन साधूंची झालेली हत्या अत्यंत दुर्देवी आहे. अशा घटना घडायला नकोत . ही घटना घडल्यानंतर अवघ्या ८ तासांत पोलिसांनी १०१ जणांना ताब्यात घेतलं आहे. या १०१ आरोपींमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीचं नाव नाही. कोणत्याही मुस्लिम व्यक्तीचा या घटनेशी काही संबंध नाही. तरीही जातीचं राजकारण केलं जात आहे. या घटनेत न्याय व्हावा म्हणून आम्ही हे प्रकरण तात्काळ सीआयडीकडे दिलं. पण या घटनेचा फायदा उचलून काही लोक जातीचं राजकारण करत आहेत, ही दुर्देवी घटना आहे. आज राजकारण करण्याची वेळ नाही. करोनाच्या संकटात एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. करोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी सर्वांचं सहकार्य हवं, असं सांगतानाच काही लोक मात्र या घटनेचं राजकारण करून मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत. त्यांनी अशी कितीही स्वप्न पाहिले तरी काही फरक पडणार नाही, असा चिमटा देशमुख यांनी काढला.
दरम्यान देशमुख यांनी वाधवान प्रकरणावरही भाष्य केलं. वाधवान कुटुंबीयांचा क्वॉरंटाइन पिरियड आज दुपारी २ वाजता संपणार आहे. ईडी आणि सीबीआयला आम्ही कालच पत्र लिहून त्याबाबतची कल्पना दिली आहे. तसेच वाधवान यांना ताब्यात घेण्याची विनंतीही सीबीआयला केली आहे. वाधवान यांना ताब्यात घ्या आणि त्यांची चौकशी करा, असं सांगतानाच मधल्या काळात काही लोक लंडनला पळाले आहेत, याकडेही त्यांनी सीबीआयचे लक्ष वेधले आहे.