Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केंद्र सरकारची अवस्था कंगाल , दारुड्यासारखी : प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारिपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.  हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून ते म्हणाले कि , केंद्र सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. ही गोष्ट सरकार लपवत आहे. त्यामुळे एखादा दारुडा जसा घरातील वस्तू विकतो, त्याप्रमाणं हे सरकार सरकारी मालमत्ता विकत आहे. हे सरकार कंगाल झालं असून या सरकारची अवस्था दारुड्या सारखी झाली आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ते पुढे म्हणाले कि , सरकार चालवण्यासाठी सरासरी १३ लाख कोटींची गरज असते. या सरकारकडे तेवढी रक्कम नाही. नवीन बजेट येईपर्यंत रक्कम जमेल की नाही याबद्दल शंका आहे. यंदा सरकारला १२ लाख कोटींची तूट येणार आहे. त्यामुळे देश चालवणं सरकारला कठिण होऊन बसणार आहे. म्हणूनच दारुडा जसा घरातील वस्तू विकतो. त्याप्रमाणं हे सरकार मालमत्ता विकत आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडीच विकण्याचा या सरकारचा हा डाव आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.

अमेरिका-इराण युद्ध झाल्यास त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचे मतही  आंबेडकर यांनी व्यक्त केले. जेएनयू हिंसाचार प्रकरणावर बोलताना ते म्हणाले कि , हे प्रकरण भाजपकडून घडवलं जात आहे. त्यात त्यांची वृत्ती आहे. हे लोक याला शहरी आतंकवादी म्हणतात. पण देशातील खरा आतंकवादी संघच आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निकालावर समाधान व्यक्त केलं. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या गांधी शांती यात्रेत प्रकाश आंबेडकर सहभागी झाले होते. सीएए, एनआरसी आणि एनपीआरला विरोध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून ही शांती यात्रा काढण्यात आली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!