मेरठला निघालेलय राहुल -प्रियंकाला उत्तर प्रदेशाच्या सीमेवरच पोलिसांनी अडवून म्हटले ” आप आगे नही जा शकते…”
उत्तर प्रदेशात मेरठमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनात मृत झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी मेरठलानिघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या सीमेवरच रोखून ” आप आज नही जा सकते ” म्हणून रोखून धरले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं कारण देत या दोघांनाही मेरठमध्ये जाण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतापले आहेत.
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू आहेत. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. मेरठमध्ये भडकलेल्या हिंसेत चार आंदोलकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. त्यामुळे मेरठमध्ये तणावाचे वातावरण असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नये म्हणून मेरठ, मुजफ्फरनगर, बुलंदशहर आणि सहारनपूर येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी आज मृतांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी मेरठला रवाना झाले होते. मात्र उत्तर प्रदेशच्या सीमेवरच पोलिसांनी त्यांना अडवून मेरठला जाण्यास मज्जाव केला. कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याचं कारण देऊन पोलिसांनी त्यांना मेरठला जाण्यास मनाई केली. राहुल आणि प्रियांका यांनी केवळ तीन जणांनाच मेरठमध्ये जाऊ देण्याची परवानगीही पोलिसांना मागितली. मात्र पोलिसांनी त्यांची ही विनंती फेटाळून लावत त्यांना मेरठमध्ये जाऊ देण्यास असमर्थता दर्शवली.
दरम्यान प्रियंका गांधी यांनी आधी बिजनौरला जाऊन हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं होतं. बिजनौरमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी प्रियांका यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. नागरिकत्व कायदा हा गरिबांच्या विरोधातला असून कुणालाही नागरिकत्व सिद्ध करण्यासाठीचे पुरावे मागण्याचा अधिकार नसल्याची टीका प्रियांका यांनी केली होती. काल सोमवारी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत राजघाटावर जाऊन सत्याग्रह आंदोलन केलं होतं. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही उपस्थित होते. यावेळी संविधांनाचा सरनामा वाचून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा निषेध नोंदवण्यात आला होता. दरम्यान, उत्तर प्रदेशात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात आतापर्यंत १० हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शेकडो लोकांना अटक करण्यात आली आहे. या आंदोलनात २५० हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत.