अभिव्यक्ती : महाराष्ट्राचे राजकारण , नमनाला घडाभर तेल…सत्तेसाठी एकत्र आले तीन पक्ष दोघांचे मंत्री ठरेच नात तर तिसऱ्याच्या यादींचेही जमेची ना…
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आधी सरकार बनविण्याचा घोळ , औटघटकेचे सरकार , नंतर स्थामन कजलेले महा विकास आघाडीचे शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार , बिनखात्याचे मंत्री , नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेले मंत्रिमंडळाचे खातेवाटप , आणि आता रेंगाळलेला मंत्रिमंडळाचा विस्तार म्हणजे नमनाला घडाभर तेल अशी सरकार पक्षाची अवस्था झाली आहे. मंत्री मंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाअभावी राज्यातील सर्व शासकीय व्यवहार ठप्प झाला आहे. शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय हाच काय तो नव्या सरकारचा महत्वाचा कार्यक्रम राहिला. आता पुन्हा चर्चा सुरु झाली आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची आणि खातेवाटपाची .
राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सातत्याने काँग्रेस -राष्टवादी आणि शिवसेनेच्या बैठक होत आहेत परंतु ठोस काहीच ठरत नाही . आज पुन्हा याच विषयावर मुंबईत सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. सांगण्यात येते कि , सुमारे दीड तास या दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. या चर्चेचा तपशील मात्र नेहमीप्रमाणे अंदर कि बात अंदर असाच राहिला. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झालं असलं तरी काँग्रेसकडून मंत्र्यांची यादी अद्याप निश्चित झालेली नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार २४ डिसेंबर ऐवजी नाताळानंतर २७ किंवा ३० डिसेंबरला होईल असे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे आज झालेल्या मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीच्या वेळी काँग्रेसकडून कुणीही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे आधी सत्ता स्थापनेचा घोळ काँग्रेसमुळे झाला तसे आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबाबतही काँग्रेसकडे बोट दाखविण्यात येत आहे . त्याचे कारण काँग्रेसकडून मंत्रिपदी कुणाकुणाची वर्णी लावायची याचा अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेणार असल्याने मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी तूर्त टाळल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे उघड आहे कि , काँग्रेसकडून यादी आल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल.
आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे सांगतात अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील. दुसरीकडे राष्ट्रवादीची यादी तयार आहे का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारला असता, आमची यादी तयार व्हायला उशीर लागणार नाही. आम्हाला कुणाची परवानगी घेण्यासाठी कुठे जावे लागत नाही. असे स्पष्ट केले आहे तर काँग्रेसच्या यादीबाबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होईल व त्या बैठकीत मंत्रिमंडळात काँग्रेसकडून कुणाची वर्णी लागणार, यावर अंतिम निर्णय होईल, असे सांगितले जात असल्याने सत्ता स्थापन होऊन महिना उलटला तरी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची यादी तयार होत नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्यामुळे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या आधुनिक भारुडाच्या शब्दात सांगायचे झाले तर सत्तेसाठी एकत्र आले तीन पक्ष । दोघांचे मंत्री ठरेच नात ।। तर तिसऱ्याच्या यादींचेही जमेची ना… असेच म्हणायची पाली आली आहे.