महाराष्ट्राचे राजकारण : राज्यपालांनी दिलेली शपथ घटनाबाह्य , राष्ट्रवादीने शिवसेनेचा पोपट केला : प्रकाश आंबेडकर
राष्ट्रवादीचे नेते अगोदरपासूनच भाजपच्या संपर्कात होते. त्यामुळे आज घटलेल्या घटनेत फार काही नवीन नाही. राज्यपालांनी घेतलेला शपथविधी कार्यक्रम घटनेला धरून नाही, राष्ट्रवादीने काँग्रेसचा पोपट केला, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लगावला.
सत्तास्थापनेच्या घडामोडींवर अॅड. प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला.आंबेडकर पुढे म्हणाले कि , ज्या पध्दतीने राज्यपालांनी शपथ दिली, हे घटनेला धरून नाही. राज्यपालांनी शपथविधी कार्यक्रमाची कल्पना द्यायला पाहिजे होती. लोकांना विश्वासात घेतल्या गेले नाही. दुसरे म्हणजे, हे अचानक घडले आहे असे मी मानत नाही.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कसे भेटतात असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले कि , राष्ट्रवादीचे काही नेत्यांची भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशी भेट झाली. दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली होती. त्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे पत्र घेऊन शरद पवार पंतप्रधान मोदी यांच्यासोबत तास,सव्वातास चर्चा करतात. या भेटीमागील राजकारण समजणार नाही, एवढे दुधखुळे आम्ही नाही. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून शिवसेनेचा पोपट केला, असा टोला त्यांनी लगावला.