Aurangabad Crime : लग्न समारंभात चोर्या करणारा विधीसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात

परराज्यातील टोळी पुन्हा एकदा सक्रीय
औरंंंगाबाद : लग्न समारंभातून २ लाख रूपये किंमतीचा ऐवज असलेली बॅग चोरी करणार्या विधीसंघर्षग्रस्त बालकास नागरीकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. लग्नसमारंभातून बॅग लंपास करणार्यांची परराज्यातील गुन्हेगारांची टोळी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष शिवनाथजी नावंदर (वय ५१, रा.बन्सीलालनगर) हे २० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मित्राच्या मुलीचा विवाह समारंभ असल्याने औरंगाबाद जिमखाना येथे गेले होते. लग्नसमारंभ सुरू असतांना आशुतोष नावंदर यांचे मित्र गोपाल जाजू यांची बॅग जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आशुतोष नावंदर व गोपाल जाजू यांनी बॅगची शोधाशोध सुरू केली असता एक विधीसंघर्षग्रस्त बालक सदरील बॅग घेवून जात असतांना त्यांच्या निदर्शनास पडला. नावंदर आणि जाजू यांनी वर्हाडातील इतर नागरीकांच्या मदतीने विधीसंघर्षग्रस्त बालकास पकडले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव करण (काल्पनिक नाव) असल्याचे सांगून मध्यप्रदेशातील गुलखेडी येथील रहिवासी असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी औरंगाबाद जिमखाना येथे जावून करणला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने लग्नसमारंभातून जाजू यांची बॅग चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबूली दिली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार सुभाष चव्हाण करीत आहेत.