हरयाणामध्ये पुन्हा मनोहरलाल खट्टर सरकार , उपमुख्यमंत्रिपदी दुष्यंत चौटाला
हरयाणाच्या मुख्यमंत्रिपदी मनोहरलाल खट्टर यांनी, तर उपमुख्यमंत्रिपदी दुष्यंत चौटाला यांनी आज शपथ घेतली. राजधानी चंदीगडमध्ये हा शपथ सोहळा पार पडला. राज्यपाल सत्यनारायण आर्य यांनी खट्टर आणि चौटाला यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. करनाल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे खट्टर हे एकेकाळी संघाचे प्रचारक होते. २०१४मध्ये हरयाणामध्ये भाजपच्या विजयानंतर त्यांची मुख्यमंत्रिपदी
दुष्यंत चौटाला शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर जात असताना, त्यांनी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा आणि दुष्यंत यांचे वडील अजय चौटालाही उपस्थित होते. भाजपला दुष्यंत यांच्या जेजेपीचा पाठिंबा मिळण्यामागे प्रकाश सिंग बादल यांची प्रमुख भूमिका असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, शपथ सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे देखील उपस्थित होते.
२०१४ मध्ये भाजपला ४७ जागांवर विजय मिळाला होता. त्यामुळं हरयाणात भाजपचं बहुमातातील सरकार होतं. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ४० जागांवरच समाधान मानावं लागलं. त्यामुळं भाजपला अपक्ष किंवा १० जागा जिंकणाऱ्या जेजेपीचा पाठिंबा मिळणे गरजेचे होते. शुक्रवारी भाजप आणि जेजेपीनं युती झाल्याचं घोषित केलं होतं.
दरम्यान दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाची काही महिन्यांपूर्वी ‘बच्चा पार्टी’ म्हणून खिल्ली उडवली जात होती. विरोधकांनीही त्यांच्या पक्षाला गांभीर्यानं घेतलं नाही. मात्र, काही महिन्यांतच दुष्यंत हे देवीलाल यांचे वारस म्हणून ओळखले जाऊ लागले. वर्षभरातच दुष्यंत यांचा जेजेपी सत्तेत सहभागी झाला.
दुष्यंत चौटाला यांनी गेल्या वर्षी इनोलोपासून वेगळं होत जननायक जनता पक्षाची स्थापना केली होती. या पक्षानं विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला. या निवडणुकीत १० जागांवर विजय मिळवण्यात पक्ष यशस्वी ठरला. जाट राजकारणाचे नायक म्हणून जनता त्यांच्याकडे पाहायला लागली आहे. इतकंच नाही तर त्यांची तुलना देवीलाल यांच्याशी होऊ लागली आहे.