महाराष्ट्र विधानसभा २०१९ : पराभवानंतर प्रकाश आंबेडकरांचे ट्विट : मतदारांचे आभार आणि कार्यकर्त्यांना धन्यवाद

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी , आपली प्रतिक्रिया देताना आपल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विट मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे कि , राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असून पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीत विजय झाला असला तरी महायुतीच्या जागा मात्र कमी झाल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादीला अनपेक्षित यश मिळालं आहे. दरम्यान या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मात्र एकही जागा जिंकू शकली नाही. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीतील कामगिरीवर ट्विट करत यापुढेही वंचित,शोषितांच्या राजकारणासाठी त्याच ताकदीने लढू असं म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे आभार !वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत चांगल्या पद्धतीने लढत दिली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने २४ लाखांपेक्षा जास्त मत मिळवली. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद”.
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “आपण जिंकू शकलो नाही, तरी १० जागांवर दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली आहेत. अनेक ठिकाणी आपण जोरदार टक्कर दिली व तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आपण सर्व संघर्षातून उभे राहिलो आहोत. यापुढेही वंचित,शोषितांच्या राजकारणासाठी त्याच ताकदीने लढू!”
“आगामी काळात वंबआघाडी राज्याच्या राजकारणात त्याच ताकदीने उभी राहील.जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर,सामाजिक,राजकीय न्याय,हक्कांसाठी आपण लढतच राहू!,” असा निर्धार प्रकास आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.