भारतरत्नवरून सुप्रिया सुळे यांची भाजपवर टीका तर संकल्पनाम्याची ” गाजरांचा पाऊस ” म्हणून उडवली खिल्ली

‘भारतरत्न’ हे सरकारचं ‘इलेक्शन गिमिक’ असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. कल्याणमध्ये मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेनंतर सुप्रीया सुळे यांनी ही टीका केली. भाजपच्या संकल्पनाम्याची ‘गाजरांचा पाऊस’ म्हणूनही त्यांनी खिल्ली उडवली.
भाजपनं आजच आपला संकल्पनामा जाहीर केला असून यात स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचं म्हटलंय. मात्र, प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील २ ते ३ वर्षांपासून लोकसभेत करत होते. त्यावेळीही यांचंच सरकार होतं, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. भाजपचा संकल्पनामा म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीकाही त्यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरून सध्या सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत भूतकाळ पुन्हा उकरून काढण्यापेक्षा वर्तमानात आपल्यापुढे काय समस्या आहेत? त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. तसंच महाराष्ट्रात जर तुमचं इतकं चांगलं काम असेल, आणि पैलवान तयार असतील, तर दिल्लीवरून मॉनिटर कशाला बोलवावे लागतात? असा सवाल उपस्थित करत सुप्रीया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.