Gujrat : भाविकांच्या बसला अपघात , २० ठार, ३० जखमी

भाविकांच्या बसला गुजरातमध्ये भीषण अपघात झाला आहे. बनासकांठामधील त्रिशुलिया घाट, अंबाजी जवळ भाविकांची बस उलटल्याने हा अपघात झाला असून या बसमधील २० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३० जण जखमी झाल्याची माहिती आहे. बसमधील सर्व प्रवाशी हे आणंदचे रहिवाशी आहेत.
अंबाजी मंदिराला भेट दिल्यानंतर दर्शन करून परत येताना बसला हा अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला याची अद्याप माहिती समोर आली नाही. चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा किंवा गाडी चालकाला डुलकी लागली असल्याने बस उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. बस उलटल्याची माहिती समजताच पोलीस, व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्युमुखी पडलेल्या सर्वांची ओळख पटवणे अद्याप बाकी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या परिसरात सतत पाऊस सुरू असल्याने बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अडचण निर्माण झाली होती. बसमधील मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी क्रेनला पाचारण करण्यात आले. दरम्यान, नुकत्याच बनासकांठात झालेल्या एका दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला होता.
बनासकांठा या ठिकाणी झालेल्या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. बनासकांठातून खूपच वाईट बातमी मिळाली. दुर्घटनेत मृत्युमुखी झालेल्या व्यक्तींप्रती मी अत्यंत दुःखी आहे. माझ्या संवेदना पीडित कुटुंबासोबत आहेत. स्थानिक प्रशासन मदत कार्य करीत आहे. जखमी झालेले सर्व लोक लवकरात लवकर बरे होवो, अशी माझी प्रार्थना आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे.