मुंबईसह विदर्भ , उत्तराखंड , छत्तीसगढ , दक्षिण गुजरात देशात अनेक राज्यात पावसाचे जोरदार आगमन
अल्पशा विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज पहाटेपासूनच मुंबई आणि उपनगरांतही मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. काल पावसानं थोडी उसंत घेतली होती. पण, सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मुसळधार पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. ठाणे, डेंबिवलीतही पावसानं हजेरी लावली आहे. दिवा, कल्याण आणि ग्रामीण भागात रात्रीपासूनच पाऊस पडत असूनच मध्येच जोरदार पाऊस तर मध्येच हलक्या सरी पडत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात अधून मधून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पश्चिम उपनगरात पाऊस जोरदार कोसळतो आहे.
आपल्या शहरातील पावसाचा अंदाज घेत मुंबईकरांनी घराबाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे. तर पावसामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याचीही शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोक फिरायला जाण्याचं प्लानिंग करतात. अशा वेळी काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले ३ दिवस जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ७ जुलैपर्यंत देशातल्या अनेक राज्यांत मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पुढील २४ तासात तासांत मध्य प्रदेश आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामानाची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे आणि त्यामुळे मान्सून वेगाने पुढे जाऊ शकतो. राजधानी दिल्लीमध्ये मात्र अजूनही उष्णतेच्या झळा कायम आहेत. इथे सगळेजण पावसाची वाट पाहत आहेत. मुंबईमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. २००५ नंतर मुंबईत २४ तासात एवढा मुसळधार पाऊस सोमवार आणि मंगळवारी झाला. आजही काही भागात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. उत्तराखंड, छत्तीसगड, दक्षिण गुजरात, कर्नाटकची किनारपट्टी, केरळ, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, तेलंगणा या राज्यांत जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकण, गोवा, कर्नाटकची किनारपट्टी या भागांसोबतच ईशान्य भारत, मध्य प्रदेश, ओडिशा या राज्यांतही चांगला पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात आला आहे .