तिवरे धारण फुटल्या प्रकरणी जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ७ जणांचा मृत्यू

रत्नागिरीतील तिवरे धरण दुर्घटनेतील मृत्यू हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. त्यामुळे या सरकारवर हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. तिवरे धरण फुटल्यानं परिसरातील सात गावं पाण्याखाली गेली होती. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानं ७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळं मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागलं होतं. काही वेळानं धरणाला भगदाड पडल्याचं लक्षात आल्यानं तलाठ्यांनी धरणाच्या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला. पण तासाभरातच धरण फुटलं आणि परिसरातील गावांमध्ये पाणी शिरलं होतं. बेंड वाडीतील काही ग्रामस्थ वाहून गेले.
आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असतानाच, विरोधकांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी अनास्थेचे हे बळी आहेत. त्यामुळं या सरकारवरच हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली आहे. सर्व धरणांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या कंपनीने धरणाचे बांधकाम केले होते. त्यामुळं आमदार आणि कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. तसंच नैतिक जबाबदारी स्वीकारून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी घेतला मदत कार्याचा आढावा
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे येथे मंगळवारी रात्री धरण फुटल्यामुळे सात जण ठार झाले आहेत तर २१ जण अजूनही बेपत्ता आहेत. मृतांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हळहळ व्यक्त केली असून मदतकार्याचा आढावाही त्यांनी घेतला आहे. तसंच याप्रकरणासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करू असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
मुसळधार पावसामुळे तिवरे येथील धरण मंगळवारी रात्री फुटले. हे धरण फुटल्यामुळे नजीकची एक वाडी वाहून गेली. या वाडीतील ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत तर २१ जणांचा शोध अजूनही सुरू आहे. जिल्हा प्रशासनासोबतच नागरिकांची मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलालाही पाचारण करण्यात आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधत मदतकार्याची चौकशी केली. तसंच त्यांना काही सूचनाही दिल्या. या दुर्घटनेची चौकशी करुन गुन्हेगारांविरोधात पुढील कार्यवाही तातडीने केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.