भारत -पाक च्या १६ जूनच्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष , जशास तसे उत्तर न देता शांततेत खेळण्याचे इम्रान खान यांचे आवाहन

‘आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तान क्रिकेट संघाने केवळ खेळावरच लक्ष केंद्रित करावे’, अशा सूचना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानयांनी पाकिस्तानी क्रिकेट संघाला दिल्या आहेत. येत्या १६ जून या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान हा वर्ल्डकपमधील बहुप्रतीक्षित सामना होत आहे. या सामन्यापूर्वी इम्रान खान यांनी ही सूचना केली आहे. पाकिस्तानी खेळाडूंनी ‘जशास तसे’ हा दृष्टीकोन न ठेवता फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असे इम्रान यांनी पाक संघाला सांगितले आहे. भारताचे गडी बाद झाल्यानंतर वेगळ्या प्रकारचा आनंद व्यक्त करण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव पाक संघाने इम्रान खान यांना पाठवला होता. ही माहिती पाकिस्तान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘मुंबई मिरर’शी बोलताना दिली होती.
मार्च महिन्यात भारतीय क्रिकेट संघाने रांची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पुलवामा शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ लष्करी कॅप परिधान केली होती. भारत खेळाला वेगळाच रंग देत आहे असे म्हणत पाकिस्तानने त्यावेळी भारतीय संघाला विरोध दर्शवला होता. यालाच कृतीतून उत्तर देण्याचा पाक संघाचा इरादा होता. मात्र, स्वत: एक खेळाडू म्हणून कारकिर्द गाजवलेले इम्रान खान यांनी पाक संघाला अशा प्रकारचे कोणतेही पाऊल उचलण्याची मनाई केली आहे.