साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याशी विजया रहाटकर असहमत : त्यांचे वक्तव्य चुकीचं, अयोग्य आणि निषेधार्ह

साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आणि अयोग्य आहे. करकरे देशासाठी शहीद झाले आणि त्यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते निश्चितच निषेधार्ह आहे, असं मत भाजपाच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केलं आहे. साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते चुकीचं आहे, त्यावर त्यांनी माफीही मागितली आहे. मात्र, मुळात त्यांनी असं बोलणंच चूक आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
त्यांना उमेदवारीच का दिली असा प्रश्न विरोधकांकडून होतो आहे. याबाबत त्या म्हणाल्या, त्याबद्दलचा योग्य तो निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल. आम्ही जबाबदारी टाळली असा आरोप विरोधकांकडून होतो आहे. मात्र, तसं नाही साध्वी प्रज्ञा जे बोलल्या ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. भाजापाचा त्याच्याशी संबंध नाही. विरोधक काय म्हणत आहेत त्याला फारसं महत्त्व आम्ही देत नाही.