बाणाचा नाद सोडून “अर्जुन ” “हाता”च्या साहाय्याने ” कमळ ” खुडण्याच्या तयारीत !!

शिवसेनेचे बहुचर्चित आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसआमदार अब्दुल सत्तार यांच्या भेटीमुळे काहीही झाले तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा . रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढणार हे अधोरेखित होत आहे . आपण उद्धव ठाकरे यांच्या शब्दाबाहेर नसल्याचे खोतकर कितीही सांगत असले तरी शेवटी आपल्या राजकीय भवितव्यासाठी खोतकर यांना खा . रावसाहेब दानवे यांना राजकीय गरजेचे झाले आहे . त्यांच्या दोघांमध्ये कोणी कितीही मध्यस्थी केली तरी अर्जुन खोतकर ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने उद्धव ठाकरे त्यांना काही सांगण्याची शक्यता दिसत नाही .
शिवाय काँग्रेसमध्ये अर्जुन खोतकर यांनी थेट प्रवेश घेतला तरी त्यांना जालना जिल्ह्यात काँग्रेससाठी पूर्णतः रान मोकळे आहे . दरम्यान या पार्श्वभूमीवर सत्तर -खोतकर भेटीला महत्व आहे . या भेटी नंतर या दोन्ही नेत्यांनी आमचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगत मैत्रीच्या नात्याने त्यांची भेट घेतल्याचे असले तरी यामागे निश्चितच राजकारण आहे हे उघड आहे . आपण केवळ चहा पिण्यासाठी आलो होतो, असे सांगतानाच सत्तार यांनी पुढील दोन दिवसांत खोतकर यांच्यासंदर्भात गुड न्यूज मिळेल असे सांगितले. त्यामुळे खोतकर शिवसेनेला रामराम ठोकणार की, भाजप-शिवसेना युतीचे मराठावाड्याचे समन्वयक म्हणून काम पाहणार यात सस्पेन्स निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने देखील जालना लोकसभेसाठीच्या उमेदवाराची घोषणा अद्याप केली नाही. तर बच्चू कडू देखील दानवे यांच्याविरोधात आक्रमक असून त्यांनी वेळ पडल्यास खोतकर यांना पाठिंबा देऊ असेही म्हटले आहे. तर भाजपकडून जालना लोकसभेत विजयाची हॅटट्रिक करणारे दानवे यांचे तिकीट निश्चित आहे. परंतु खोतकर यांच्या भूमिकेवर पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहे. यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची चिंता वाढणार एवढे मात्र नक्की. पण मैदानात कोणीही असले तरी आपण नक्कीच विजयी होणार याची दानवेंना खात्री आहे.
राजकारणात आपल्या हितशत्रूंना शह देणे राजकारण्यांचा धर्म असतो ते यापुढे युती धर्म वगैरे सगळे व्यर्थ असते तत्वाच्या बाताही व्यर्थ असतात आणि अर्जुन खोतकर त्याला अपवाद असू शकत नाहीत. शिव बंधनातही तितका दम नाही कि जे जाणाऱ्यांना रोखू शकतील . खोतकरांनी गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी केली आहे. त्यांच्या मागे तरुण कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे . भाजप-सेने युतीच्या काळात खूपच उशिरा मंत्रिपद मिळाल्यानेही खोतकर नाराज होते.