राममंदिर प्रकरणातील न्यायालयाच्या भूमिकेवर संघाची नाराजी
सर्वोच्च न्यायालयाने राम जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या प्रकरणात शुक्रवारी मध्यस्थीसाठी तिघांची नियुक्ती केली असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाना सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. तसेच हिंदूंकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश फकीर महम्मद इब्राहिम खलिफउल्ला या मध्यस्थ समितीचे प्रमुख असून त्यात वरिष्ठ वकील श्रीराम पांचू आणि आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांचा समावेश आहे. या भूमिकेबाबत आरएसएसने खंत व्यक्त करताना म्हटले आहे कि , इतकी वर्ष सुरु असलेला हा वाद मिटवण्यासाठी न्यायालयीन प्रकियेत वेग आणण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका आश्चर्यकारक आहे. हा हिंदूंचा भावनिक विषय असून या संवेदनशील विषयाला सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिकता न देणं समजण्यापलीकडे आहे. पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘हिंदूंकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. आम्ही न्यायालयाचा मान राखतो. मात्र या वादावर लवकरात लवकर तोडगा काढत वेगवान प्रक्रिया राबवत न्यायालयाने निर्णय द्यावा आणि भव्य राम मंदिर उभारण्यात येणारे अडथळे दूर करावेत.