राष्ट्रवाद हा भाजपा आणि संघासाठी राजकारणाचा मुद्दा तर मोदी -अमित शहा गुंड : वाजपेयींची पुतणी करुणा शुक्ला यांचा आरोप
पंतप्रधान मोदींनी सत्तेच्या लालसेपोटी भाजपाची विचारसरणीच बदलून टाकल्याचा आरोप करुणा शुक्ला यांनी केला असून नरेंद्र मोदी अन् अमित शाह हे गुंड असल्याची टीका देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणीने मोदी अन् अमित शहांच्या नेतृत्वावर जबरी टीका केली आहे. बाराबंकी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना करुणा शुक्ला यांनी मोदी आणि अमित शहांवर घणाघाती टीका केली. शुक्ला यांनी २०१४ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज भाजपाचे आदर्श नेते म्हणजे पंतप्रधान ज्यांनी गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यासाठी २००२ साली दंगलीचा कट रचला. तर, दुसरे म्हणजे गुजरातचे माजी गृहमंत्री, जे अडीच वर्षांसाठी तडीपार होते. भाजपाचे हे आदर्श गुंड देशाच्या हितासाठी काहीही करत नसल्याचं शुक्ला यांनी म्हटलंय. भाजपाकडून अटलजी, अडवाणीजी आणि भाजपाच्या विचारसरणीशी तडजोड केली जात आहे. राष्ट्रवाद हाच सध्या भाजपा आणि आरएसएससाठी राजकारणाचा मुद्दा बनला आहे. मोदी आणि शहा यांच्याकडून भारत माता की जय, वंदे मातरम यांसारख्या मुद्द्यांवरुन देशभक्तीचं राजकारण केलं जात आहे. पण, त्यांच्यासाठी भगवा झेंडाच तिरंगा असतो. कारण, त्यांच्याकडून मूळ मुद्द्यांना बगल देण्यासाठी नागरिकांचे लक्ष अशा मुद्द्यांकडे वळवले जाते, असेही शुक्ला यांनी म्हटले. दरम्यान, शुक्ला यांनी ३२ वर्षे भाजपात काम केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. १९९३ साली मध्य प्रदेशात आमदार म्हणून निवडून आलेल्या शुक्ला 2004 साली छत्तीसगडच्या जांजगीर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. भाजपच्या महिला मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह तसेच भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचे बिनसले होते. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपला जय श्रीराम केला होता.