Pakistan : जेंव्हा राम गोपाल वर्मा पाकिस्तानवर संतापतात …
भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. या हल्ल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दोन्ही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. त्यातच, भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक ट्विट करत, कुरापतखोर पाकिस्तानला तंबी दिली आहे.
‘ऐ पाकिस्तान, अगर तुम एक मारोगे तो हम चार मारेंगे,’
असे राम गोपाल वर्मा यांनी ट्विट आहे. यापूर्वी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरही राम गोपाल वर्मा यांनी अशीच संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पुरावे मागणारे आणि भारताला धमकी देणारे पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना राम गोपाल वर्मा यांनी जबरदस्त टोला लगावला होता. “संवादानं प्रश्न सुटले असते, तर तीनवेळा तुमचा घटस्फोट झाला नसता,” असे ट्विट वर्मा यांनी केले होते. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये इम्रान खान यांना टॅग केले होते. वर्मा यांच्या या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. यानंतरही एकापाठोपाठ एक असे पाच ट्विट करत त्यांनी इम्रान खान यांना लक्ष्य केले होते. “समोरुन एक जण तुमच्या दिशेने एक गाडी घेऊन येतो. ती आरडीएक्सने भरलेली असते. त्या व्यक्तीशी आम्ही संवाद कसा साधायचा, हे इम्रान खान यांनी शिकवावं. खान यांनी याबद्दल मार्गदर्शन केल्यास, आम्ही भारतीय त्यांना गुरुदक्षिणादेखील देऊ ” , असे राम गोपाल यांनी लिहले होते. ‘प्रिय पंतप्रधान इम्रान खान, जर तुमच्या देशात ओसामा आहे, हे अमेरिकेला समजतं. पण तुमच्या स्वत:च्या देशाला कळत नाही. तुमचा देश खरंच तुमचा आहे?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.