Amrawati : “तिरंगा” असलेल्या काठीने आंदोलकांना आपण झोडपतोय , याचे अमरावती शहर पोलीसांना भानही राहिले नाही…
अमरावती: वंचित बहुजन आघाडीने सीसीए व एनआरसी विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. अमरावती शहरात शुक्रवार रोजी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंद आंदोलनादरम्यान आंदोलक कार्यकर्ते व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते परंतु दुकानासमोर पोलीस असल्याने काही दुकानदारांनी आंदोलकांकडे लक्ष दिले नाही त्यामुळे चिडलेले काही कार्यकर्ते दुकानाच्या दिशेने जात असताना त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. विशेष म्हणजे अमरावती शहर पोलीसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी त्यांना झोडपणास सुरुवात केली . विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना हि मारहाण करीत असताना त्यांच्याच हातातील तिरंगा झेंडा असलेल्या काठीने आपण कार्यकर्त्यांना ठोकत आहोत याचेही भान राहिले नाही. हा प्रकार व्हिडीओ आणि कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकारामुळे कार्यकर्ते आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत आहेत. सीसीए व एनआरसी विरोधात वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवार रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. अमरावती शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळयाला अभिवादन करुन अमरावती शहर बंद करण्याकरिता निघाले होते.
वंचित बहुजन आघाडीचे आंदोलक कार्यकर्ते डफरीन चौक येथील मांगीलाल हाईट याठिकाणी पोहोचल्यानंतर आंदोलकांनी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे शांततेने आवाहन केले परंतु पोलीस जमावासोबत असल्याने काही दुकानदारांनी आपली दुकाने चालूच ठेवली हे पाहून चिडलेले काही उत्साही कार्यकर्त्यांनी दुकानाच्या दिशेने जात असतानाच त्यांना पांगविण्यासाठी पोलीसांनी सर्वच कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये मो. सलिम मो. कौशिक, मो. अलिम मो. वकील, राजेश जानराव गोळे, अनिल भिमराव फुलझेले, रितेश साहेबराव भटकर हे जखमी झाले. त्यांच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार करण्यात आला. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ नेते प्रमोददादा इंगळे, लेफ्टनंट कमांडर अलिम पटेल, हरिदास दंदे, सुरेश तायडे, अश्विन वानखडे, किरण गुडधे, सिध्दार्थ देवरे, अनिल फुलझले यांच्यासह १३ आंदोलकांना ताब्यात घेवून स्थानबध्द केले होते. त्यानंतर काही तासांनी आंदोलकांना सोडण्यात आले. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी व समविचारी संघटनांच्या पदाधिकार्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील पुतळयाजवळ पोलीसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचा निषेध केला.