विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कारावरून आक्षेप
विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कार निवडीवरून वाद
राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन पुरस्कार’ बशीर कमरोद्दीन मोमीन (कवठेकर) यांना जाहीर झाला आहे. मात्र तमाशा व लोककला कलावंतांनी या निवडीवर आक्षेप घेतला आहे. कवठेकर यांनी लेखन केले आहे. पण तमाशासाठी काय काम केले का? असा सवाल कलाकारांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. पुरस्कार निवड समिती बरखास्त करा, अशी मागणी कलाकारांनी केली.
लोकशाहीर गफूरभाई पुणेकर सोशल फाउंडेशन, कलाकार महासंघ आणि तमाशा व लोककला कलावंतांनी सरकारच्या निवडीवर जोरदार आक्षेप नोंदवले. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला दरवर्षी राज्य सरकारतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये, मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. कवठेकर यांना पुरस्कार देण्यास प्रशांत बोगम, अमर पुणेकर, सत्यभामा आवळे यांनी विरोध दर्शवला. यावेळी मीना गायकवाड, प्रभा महाडिक हे कलाकार उपस्थित होते.
सरकारच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. पुरस्कार वितरण कार्यक्रमात कलाकार सरकारचा निषेध करतील. कवठेकर यांनी काय काम केले ? ज्येष्ठांना डावलून इतरांना पुरस्कार दिला जात आहे. प्रत्यक्ष फडात काम न करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जातोय, अशी टीका पुणेकर यांनी केली. एका व्यक्ती ऐवजी पाच लोकांना प्रत्येकी एक लाख या स्वरुपात पुरस्कार द्यावा, अशी मागणी पुणेकर यांनी केली.