ओवेसींनी तोंड सांभाळून बोलावे, हिस्सा म्हणत असतील तर तो १९४७ लाच दिला : माधव भंडारी

ओवैंसींनी साभाळून बोलले पाहिजे. त्यांना कोणीही कधीही भाडेकरू असे म्हटले नाही. ते हिस्स्याची गोष्ट करत असतील तर तो हिस्सा १९४७ मध्येच देण्यात आला आहे, असे प्रत्युत्तर भाजपाचे नेते माधव भांडारी यांनी दिले. भारतात मुस्लीम भाडेकरू म्हणून राहत नाही. त्यांचा भारतात बरोबरीचा हिस्सा आहे, असे वक्तव्य एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी केले होते. त्याला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शुक्रवारी दिल्लीमध्ये असदुद्दीन ओवैसी यांची सभा पार पडली. त्या सभेत ओवैसी यांनी कोणाचीही मनमानी सहन करणार नसल्याचा इशारा दिला होता. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपाने ३०० जागा जिंकल्या म्हणजे आपण देशात मनमानी करू असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजू नये असेही ओवैसी यांनी म्हटले होते. तसेच भारतीय राज्यघटनेचा हवाला देत त्यांनी आपण कायम मुस्लिमांच्या हक्कासाठी लढत असल्याचेही सांगितले होते. भाजपाची सत्ता आली म्हणून देशातील मुस्लिमांनी घाबरु नये. ते या देशाचे भाडेकरू नसून हिस्सेदार आहेत. संविधानानुसारच त्यांना धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क देण्यात आला आहे. जर पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर मुस्लीम बांधवही मशिदीत जाऊ शकतात, असे ओवैसी म्हणाले होते.
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही ओवैसी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. केवळ आपली पोळी भाजण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करत असतात. त्यांच्या धर्म-जाती आणि प्रादेशिकत्वाबाबत वायफळ वक्तव्यांचा कोणालाही फायदा होत नाही. देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वजण सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले होते.