१४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा

अलीगड मुस्लीम विद्यापीठात तणाव..
भारतविरोधी घोषणाबाजी दिल्याच्या आरोपाखाली अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) १४ विद्यार्थ्यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या बरोबरच, विद्यापीठात तणाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली आणखी ५६ विद्यार्थ्यांना अटक करण्यासाठी अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे. एएमयूमध्ये तणावाचे वातावरण असल्याने इथली इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एएमयूतील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
एएमयू विद्यार्थी संघटनेने मंगळवारी सामाजिक विज्ञान विभागाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या कार्यक्रमात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ओवेसींच्या कार्यक्रमाला काहींनी विरोध दर्शवला. या विरोधात सहभागी असलेला विद्यार्थी नेता अजय सिंग याला विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने मारहाण केली असे सांगितले जात आहे. त्यानंतर तणाव वाढला.
दरम्यानच्या काळात एएमयू परिसरात विद्यार्थ्यांच्या एका गटाने फिरत फिरत कथित देशविरोधी घोषणा दिल्या. इतकेच नाही, तर या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी या घोषणाबाजीचा एक व्हिडिओ मिळाला आहे. या व्हिडिओद्वारे घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यात आली आहे.
या प्रकरणी आता पर्यंत १४ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एफआयआरमध्ये एएमयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष सलमान इम्तियाज, सचिव हुजैदा आमिर, उपाध्यक्ष हमजा सूफियान आणि संघटनेचा माजी सचिव नदीम अंसारी यांची नावे आहेत.
त्याच प्रमाणे विद्यापीठातील वातावरण बिघडवण्याचे काम करणाऱ्या ५६ विद्यार्थ्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढले जाणार आहे. या ५६ विद्यार्थ्यांना विद्यापीठातून काढून टाकण्यासाठी एएमयू प्रशासनाला पत्रही लिहिण्यात आले आहे.