ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी: प्रणव मुखर्जी

लोकसभा निवडणुकांचे निकाल उद्यावर आलेले असतानाही ईव्हीएम ची चर्चा काही काही कमी व्हायला तयार नाही . निवडणूक संपल्यानंतर आणि विशेष करून सोमवारनंतर जागोजागी EVM मशीन मिळाल्याच्या बातम्या येत आहेत. जिल्हा प्रशासन दबावाखाली मतमोजणीत EVM बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असा विरोधी पक्षांनी आरोप केला असून निवडणूक निकालांआधी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकवार ईव्हीएमवर हल्लाबोल केला आहे. आज दिल्लीत १९ विरोधी पक्षांनी ईव्हीएमप्रश्नी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. आता माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही ईव्हीएमशी कथित छेडछाडीच्या शक्यतांबाबत चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाच्या ताब्यात असणाऱ्या सर्व ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी असल्याचे मुखर्जी यांनी म्हटले आहे.
मुखर्जी यांनी एक निवदेन जारी केले आहे. त्यात ते लिहितात, ‘आपल्या लोकशाहीच्या मूळ तत्वांना आव्हान देईल अशा शक्यतांना कोणतंही स्थान असू नये. जनादेश पवित्र आहे आणि तो कोणत्याही प्रकारच्या संशयापलीकडचा असायला हवा.’ एक्झिट पोलनंतर विरोधकांमधील हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीत विरोधकांच्या बैठका वाढल्या आहेत. १०० टक्के ईव्हीएम व्हीव्हीपॅटशी ताडून पाहावेत, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. दरम्यान, सर्व ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅट लावण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.