मध्य प्रदेश : कमलनाथ सरकारला खो देण्याचा भाजपचा प्रयत्न

मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. आमदारांचा घोडेबाजार करून पुन्हा सत्तेत येण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्त्वातील सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र लिहून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी भाजपने केली आहे. दरम्यान राज्यातील काँग्रेसचं कमलनाथ सरकार भक्कम आहे. भाजपला आता दिवसाही स्वप्न पडू लागली आहेत. मोठ्या संख्येत आमदारांनी मागणी केल्यावर किंवा मुख्यमंत्र्यांनी ठरवल्यावर विधानसभेचं विशेष अधिवेशन होऊ शकतं, असं काँग्रेस नेते मुकेश नायक यांनी सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारलं असून काँग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे. पण भाजपकडून राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याचा हालचाली सुरू झाल्या आहे. भाजपकडून आमदारांचा घोडेबाजार करण्यात येतोय, असा आरोप काँग्रेसचे मध्य प्रदेशचे प्रभारी दीपक बाबरीया यांनी केलाय. आमदारांच्या घोडेबाजीवर आमचा विश्वास नाही. मात्र कमलनाथ सरकार आपोआप कोसळेल आणि हे लवकरच घडेल. यामुळे विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी आम्ही राज्यपालांना पत्र लिहित आहोत, असं मध्य प्रदेशातील भाजपचे विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी सांगितलं.
२०१८ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या शिवराजसिंह चौहान सरकारचा पराभव करत सत्ता मिळवली. विधानसभेच्या एकूण २३० जागांपैकी काँग्रेसचे ११४, भाजपचे १०९, बसपाचे २, सपाचा १ आणि ४ अपक्ष आमदार आहेत. बसपा आणि इतर अपक्ष आमदारांनी कमलनाथ सरकारला पाठिंबा दिला आहे.