वादग्रस्त विधाने करणाऱ्या भाजपच्या वाचाळवीरांना पक्षाने मागितले दहा दिवसात खुलासे

भाजप मधील वाचाळ नेत्यांच्या वाचाळगिरीची गंभीर दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असून या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा पक्षाक्षी काहीही संबंध नाही, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. तसेच या नेत्यांच्या वक्तव्यांची दखल पक्षाच्या शिस्तपालन समितीने घेतली असून, त्यांना दहा दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले की, साध्वी प्रज्ञा सिंह, अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी केलेली वक्तव्ये ही त्यांचे वैयक्तिक मत आहेत . भाजपाचा त्यांच्याशी संबंध नाही. त्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन माफी मागितली आहे. तरीही भाजपाने त्यांच्या या वक्तव्यांची गंभीर दखल घेतली असून, त्यांची वक्तव्ये शिस्तपालन समितीकडे पाठवण्यात आली आहेत. तसेच शिस्तपालन समितीने या नेत्यांना दहा दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता, असे विधान अभिनेता कमल हसन यांनी केले होते, त्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त होता, आहेत आणि राहील, अशा शब्दात साध्वी प्रज्ञा सिंह यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. मात्र वाद वाढल्यावर त्यांनी माफी मागितली होती. मात्र नंतर अनंतकुमार हेगडे आणि नलीन कतील यांनी साध्वींच्या वक्तव्याचा आधार घेट ट्विट केले होते.